पुणे : पुणे महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नाले आणि गटारांची सफाई जवळपास पूर्ण झाली, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. पहिल्या पावसातच रस्त्यावर पाणी साठण्यास केवळ मेट्रोचे काम जबाबदार असल्याचेही प्रशासनाकडून नमूद केले जात आहे.
पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून शहरातील नाले आणि सांडपाणी जलवाहिन्या, पावसाळी गटारे आदींची सफाई केली जाते. यावर्षी ही कामे जवळजवळ शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केला आहे. शहरातील नाल्यांची सुमारे एकूण एक लाख 70 मीटर इतकी सफाई केली गेली आहे. तसेच पावसाळी गटारांच्या वाहिन्यांच्या सफाईची सुमारे 92 टक्के कामे पूर्ण झाली आहे. तर गटरांची सफाईची कामे 90 टक्के पूर्ण झाली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जास्त व्यासाच्या वाहिन्या टाकल्या गेल्या आहेत, असे डॉ. खेमनार यांनी सांगितले.
ज्या वाहिन्या खराब झाल्या, तुंबल्या होत्या त्या काढून नवीन वाहिन्याही टाकण्याचे काम झाले आहे. नालेसफाई आणि गटारे, वाहिन्या स्वच्छ करण्याच्या कामाच्या निविदांची मुदत ही एक वर्षाच्या कालावधीची आहे. यामुळे पुढील काळात जर काही ठिकाणी पावसाचे पाणी साठले तर त्यावर कार्यवाही करता येणार आहे, असे डॉ. खेमनार यांनी सांगितले. शहराच्या जुन्या हद्दीत कामे झाली असली, तर समाविष्ट गावांतील वाहिन्यांची सफाईचे काम गतीने झाले नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
पहिल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या तक्रारी आल्या होत्या, यातील तक्रारी या मेट्रोचे काम सुरू असलेल्या भागातील होत्या. त्यानुसार आम्ही मेट्रोला योग्य ती कार्यवाही करण्याला सांगितले आहे.
– डॉ. कुणाल खेमनार (अतिरिक्त आयुक्त, मनपा)