पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी दुपारी पाहणी केली. या वेळी रस्त्यावरील खड्डे, ठिकठिकाणी पडलेली वाळू आणि अस्ताव्यस्त बॅरिकेटसंदर्भात त्यांनी महापालिका, पीएमआरडीए आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांना किती वेळात ही डागडुजी करणार, असा सवाल केला. त्याचबरोबर आज काम झाल्याशिवाय घरी जायचे नाही, असा दमही भरला. त्यांचा रुद्रावतार पाहूण अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.
मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे विद्यापीठ चौकात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. सोशल मीडियातून याचे खापर वाहतूक शाखेवर फोडले जात आहे. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन खुद्द पोलीस आयुक्तांनीच विद्यापीठ चौकात भेट दिली. या वेळी त्यांनी विद्यापीठ चौक, बाणेर, पाषाण आणि सुस रोडची पाहणी केली.
रस्त्यावर पडलेली अस्ताव्यस्त खडी आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना करावी लागलेली कसरत पाहून आयुक्तांचा पाराच चढला. त्यांनी कडक शब्दांत महापालिका, पीएमआरडीए आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. खड्डे, खडी आणि अस्ताव्यस्त बॅरिकेटसमुळे वाहतूक संथ होऊन कोंडीत भर पडत असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
ही कामे किती दिवसांत करणार, असा खडा सवाल त्यांनी विचारला. त्यांच्या रागाचा पारा पाहून अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या वेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक उपायुक्त शशिकांत बोराटे उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार भर उन्हात एक ते दीड तास पुणे विद्यापीठ चौक परिसरात होते. त्यांनी चालत चालत सर्व रस्त्यांची पहाणी केली. त्यांच्या मागोमाग पीएमआरडीए, मेट्रो आणि महापालिकेचे अधिकारी होते. एकतर उन्हाच्या कडाक्यामुळे अधिकारी घामाघूम झाले होते. त्यातच पोलीस आयुक्तांचा वाढलेला पारा पाहून त्यांच्या अवस्था आणखीनच बिकट झाली होती.
कामात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका प्रत्यक्ष जागेवर दाखवून दिल्या. वाहतूक संथ होण्यास आणि कोंडी होण्यास कारणीभूत घटक दाखवून दिले. त्यांच्या या पवित्र्यामुळे ही कोंडी सुटण्यास प्रशासनातील अधिकारी निश्चितच उपाययोजना करतील, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांतून व्यक्त करण्यात येत होती.
४१ चौक आणि ३० अपघातप्रवण क्षेत्रांची दोन्ही आयुक्तांकडून पाहणी
दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार रस्त्यावर उतरले आहेत. दोन्ही आयुक्तांकडून शहरातील वाहतूक कोंडी होणारे ४१ चौक आणि ३० अपघातप्रवण क्षेत्रांसह महापालिकेकडून विकसित करण्यात येत असलेल्या १५ आदर्श रस्त्यांचीही पाहणी करण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांची संयुक्त बैठक झाली होती. यात दोघांनीही एकत्र येऊन कोंडी फोडण्याचे निश्चित केले होते.