पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या दहा वर्षांत केंद्र शासनाच्या माध्यमातून भाजप तसेच राज्यातील महायुती सरकारने पुण्यात मेट्रो, स्मार्ट सिटी, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, पीएमपीसाठी ई-बस, वैद्यकीय महाविद्यालय, सर्वसामान्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प दिले. यातून शहराच्या दीर्घकालीन विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.
पुणेकर नागरिक नेहमीच्या विकासाच्या बाजूने असतात, मतदान करतात आणि उमेदवाराला निवडून देतात. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीतही पुणेकर मतदार पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी माझ्या माध्यमातून आपले अमूल्य मत मला निश्चित देतील, असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी येथे व्यक्त केला.
मोहोळ यांनी शुक्रवारी दैनिक “प्रभात’च्या नारायण पेठ येथील मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी १९९३ पासूनचा तीन दशकांचा आपला राजकीय प्रवास उलगडला. तसेच पुण्यासाठीचे आपले “व्हिजन’ मांडले. यावेळी “प्रभात’चे सरव्यवस्थापक बी.एल स्वामी यांनी मोहेळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. “प्रभात’चे कार्यकारी संपादक अविनाश भट, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, व्यवस्थापक सी.ए. रविकुमार इंडी, मुख्य बातमीदार सुनील राऊत उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, “केंद्रात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पुणे शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. गेल्या दहा वर्षांत शहरासाठी अनेक मोठे प्रकल्प केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आले. सोबतच २०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहरासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली.
शिवाय, महापालिकेत सत्ता असताना २०१७ ते २०२२ या कालावधीत शहर विकासासाठी भाजपने मोलाची भूमिका बजावली. पुणेकर हे निश्चितच विकासाच्या बाजूने आपले मत तयार करतात. मतदान करतात आणि निवडून देतात. त्यामुळे २०१४ पासून पुण्यात भाजपचा खासदार असून, या निवडणुकीतही पुणेकर पुन्हा एकदा विकासालाच मतदान करतील, असा मला विश्वास आहे.’
शहरासाठी दीर्घकालीन योजनांची गरज
पुणे शहर हे भौगोलिकदृष्टया राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे. शहराची लोकसंख्याही ६० लाखांवर गेली आहे. परिणामी, वाढत्या नागरीकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही प्रश्न स्थानिक, काही राज्य तर काही केंद्र सरकारच्या पातळीवरील आहेत. पुणेकरांनी आपल्याला संधी दिल्यास या तीनही स्तरावरील दुवा म्हणून आपले शहर विकासाला प्राधान्य राहणार आहे.
यात प्रामुख्याने मेट्रो सेवेचा विस्तार, आंतराष्ट्रीत विमानतळ, पीएमपी अधिक सक्षम करणे, वाढत्या प्रदूषणाला आळा घालणे, लगतच्या शहरांसाठी रेल्वेचे जाळे उभारणे यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. पुणे शहरात या विषयातील अनेक अभ्यासक असून वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर आहेत. त्याची मदत घेऊन आणि नागरीरिकांशी संवाद ठेऊन लोकांना सोबत घेऊनच शहराचे व्हिजन तयार केले जाणार आहे. तसेच ते केंद्राच्या माध्यमातून राबविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.