जम्मू – भारतीय जनता पार्टी जम्मू काश्मीरातील लोकांना सामोरे जाण्यास घाबरत आहेत म्हणूनच ते या राज्यातील निवडणुकां लांबवत आहेत असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील मतदार याद्यांचे काम 15 ऑगस्टपूर्वी करता येणार नाही,असे त्या राज्याच्या प्रशासनाने म्हटले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
त्या वृत्ताचा संदर्भ देत आप नेते हर्ष देव सिंह म्हणाले की, निवडणुकांच्या विलंबासाठी दिलेली ही आणखी एक फालतू सबब आहे. .आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयश आल्यामुळे भाजप काही ना काही बहाणा करून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यांना लोकांना सामोरे जाण्याची भीती वाटते राज्यपाल राजवटीच्या माध्यमातून मागच्या दाराने त्यांना येथे सरकार चालवायचे आहे असे सिंह म्हणाले. जम्मू काश्मीरात लोकनियुक्त सरकार सत्तेवर आले की तेथील दहशतवाद हळूहळू संपुष्टात येतो हा मागील अनुभव आहे. त्यामुळे या राज्यात त्वरीत निवडणूका घेण्याची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले.
तक्रारी मांडण्यासाठी लोकांपुढे सध्या कोणतेही व्यासपीठ नसल्यामुळे, आणि राज्यात लोकनियुक्त सरकार नसल्यामुळे जनतेला वाईट त्रास सहन करावा लागत आहे, परिणामी जनतेमध्ये अलिप्तता वाढत आहे, असे ते म्हणाले.