नवी दिल्ली -केंद्र सरकारने भरतीप्रक्रियेसंदर्भात ठोस पाऊले उचलण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे विरोधकांकडून उगारण्यात येणाऱ्या बेरोजगारीच्या अस्त्राची धार बोथट करण्यास सत्तारूढ भाजप सज्ज होऊ शकणार आहे.
देशात बेरोजगारी वाढल्याच्या मुद्द्यावरून विरोधक सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला घेरतात. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांत विरोधकांनी भाजपची कोंडी करण्यासाठी बेरोजगारी हा प्रचाराचा महत्वाचा मुद्दा बनवला. आता आगामी काळात आणखी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.
त्यापार्श्वभूमीवर, व्यापक भरतीप्रक्रियेचे केंद्राकडून करण्यात आलेले सूतोवाच भाजपचा उत्साह वाढवणारे आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांनी आणि मंत्रालयांनी पुढील दीड वर्षात 10 लाख पदे भरण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच, सशस्त्र दलांमधील भरतीसाठी सरकारने अग्निपथ ही नवी योजना जाहीर केली.
त्या पाऊलांचे भाजपने स्वागत केले आहे. व्यापक भरतीप्रक्रियेमुळे तरूणांमधील आशा आणि विश्वास दुणावेल, असे त्या पक्षाने म्हटले आहे. पद भरतीसाठी देण्यात आलेली दीड वर्षाची डेडलाईनही महत्वाची मानली जात आहे. ती डेडलाईन संपल्यानंतर पुढील चार महिन्यांत 2024 यावर्षी लोकसभा निवडणूक होईल.