खेड (विजय सोनवणे,प्रतिनिधी) : ‘सात जन्म तोच पती मिळावा म्हणुन महिला वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पुजा करतात हे सर्वसृत आहे. मात्र आता ‘सात जन्म ‘शिक्षक’ बनुन मुलांना ज्ञानार्जन करण्याचं भाग्य मिळावं’ यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी चक्क शाळेच्याच आवारात असलेल्या महाकाय शिरीषाच्या झाडाची पुजा करून व फेरे घालून आगळी -वेगळी शिरीषपौर्णिमा साजरी केली.विशेष म्हणजे या शिक्षकांनी उपवास धरून ही पौर्णिमा साजरी केली आहे.
खेड (ता.कर्जत) येथील शिक्षकांनी साजऱ्या केलेल्या वटपौर्णिमेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सध्या खेड येथील शाळेवर कार्यरत असलेले हे शिक्षक अनेक वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवुन विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान व्हावे यासाठी कल्पकतेने जीव ओतून मार्गदर्शन करत आहेत. शाळेत विविध खेळ, नामवंत व्याख्यात्यांची व्याख्याने, स्पर्धा, महापुरुषांच्या जयंत्या निमित्त वक्तृत्व स्पर्धा आदी उपक्रम राबवून मुलांना सक्षम बनवण्याचे काम ते करत आहेत. या व्यतिरिक्त वृक्षारोपण, पाणी बचत, स्वच्छता या महत्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेत आहेत.
❝ मुले उत्कृष्ट शिक्षणाच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवतात शिक्षकांसाठी यापेक्षा मोठे सुख काय असावे?शिक्षक बनून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याचे भाग्य जन्मोजन्मी मिळावे अशी भावना कायमच मनात असते.वटपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही आमची भावना व्यक्त केली ❞
– सुनिल गिरीगोसावी (मुख्याध्यापक)
शाळा ही गावाची शान असते त्यामुळे शाळेत मुले शिकत असताना कोणत्याही भौतिक सुविधांचा अभाव असू नये यासाठी लोकसहभागातुन कामे मार्गी लावण्याचा नेहमी हे शिक्षक आग्रह धरत असतात. विद्यार्थी दशेतुनच माणुस घडला जातो आणि लहान मुले ही चिखलाच्या गोळ्यासारखी असतात त्यांना जसा आकार मिळेल तशी ती घडली जातात. त्यामुळे चांगला समाज घडवण्याचे काम खऱ्या अर्थाने शिक्षकच करत असतात.
आई-वडीलानंतर शिक्षकच हे विद्यार्थ्यांचे गुरू असतात. त्यामुळे पुढील सातही जन्म शिक्षक बनून विद्यार्थी घडवण्याची शिक्षकांची भावना प्रत्येकालाच आदर्श घालून देणारी आहे. मुख्याध्यापक सुनिल गिरीगोसावी,सहशिक्षक सत्यवान अनारसे, संदीपान गायकवाड, विकास घोगरे आदींनी साजरी केलेली वटपौर्णिमा चर्चेचा विषय बनली आहे.