मुंबई : विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊत यांनी भाजपने मुद्दाम पंकजा मुंडे यांना बाजूला ठेवले असल्याचा आरोप केला आहे.
गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या द्यायच्या, सत्तेची पदे द्यायची, पण पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे भाजपचे धोरण दिसते असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच “देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे व त्या फळीत जुन्या निष्ठावान भाजप पदाधिकाऱ्यांना स्थान दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतून आलेल्यांची मोट बांधली. त्यांना राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत उमेदवाऱ्या सहज मिळाल्या. सदाभाऊ खोत, पडळकर, लाड, बोंडे यांना उमेदवारी मिळते, पण खडसे यांना पक्ष सोडावा लागतो व मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते,” असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊतांच्या या आरोपावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील देहूत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, “पंकजा मुंडे यांची काळजी करायला भाजपा समर्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील त्या लेक आहेत. त्यामुळे त्यांची काळजी करण्याची वेळ आलेली नाही. आम्ही समर्थ आहोत”. स्वागत फलकावर विठ्ठलापेक्षा मोदींचा फोटो मोठा असल्याने राष्ट्रवादीने आक्षेप घेतल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी राष्ट्रवादीने तसे फलक लावून त्यावर पांडुरंगाचा फोटो मोठा लावावा, मोदींचा लहान लावावा किंवा लावू नये असं उत्तर दिलं. काही कार्यकर्ते उत्साहात असे फलक लावतात असेही ते म्हणाले.