मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी झालेल्या लढतीत शिवसेनेचा पराभव झाला. त्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “४८ तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील” असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच पंकजा मुंडेंना एकटे पाडण्याचा भाजपाचा डाव आहे. मुंडे कुटुंबाच आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचे नातं आहे. आणि आम्हाला पंकजा मुंडेंची काळजी असल्याचेही राऊत म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी दिल्लीत संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री आणि विरोधी नेत्यांना ममता यांनी पत्र लिहले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह २२ नेत्यांना पत्र लिहिले आहे. मात्र, उद्धव ठाकरे त्यावेळी अयोध्या दौऱ्यावर असल्यामुळे या बैठकीला शिवसनेचा एक प्रतिनिधी हजर राहणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या मतमोजणीवर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यासाठी संजय राऊत यांनी भाजपला पहाटेच्या वेळी पापकृत्य करण्याची सवय लागली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.