श्रीकांत कात्रे
आयुष्यात शिक्षणाला किंमत असते, याची मनात जाणीव ठेवून मेहनतीने शिक्षणाचे टप्पे पूर्ण करत पूनम सोनवणे यांनी कुटुंबाला आर्थिक स्थिरता मिळवून दिली. त्याशिवाय अनेकांना शिक्षणासाठी त्या प्रोत्साहन देत आहेत. शिवणकाम करण्यापासून महिलांच्या आरोग्यासाठी काम करणे आणि मुक्त विद्यापीठात प्राध्यापिका आणि आता केंद्र संयोजकाची जबाबदारी पेलणाऱ्या पूनम सोनवणे यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
माणसाच्या मनातील जिद्द त्याला स्वस्थ बसून देत नाही. आयष्यात काही तरी करायचे या ध्यासाने एखादी महिला पेटून उठते, त्यावेळी तिच्या आणि आजूबाजूच्या जीवनात परिवर्तन साध्य झाल्याशिवाय राहत नाही. म्हसवडच्या पूनम सोनवणे यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. नववीनंतर खंडित झालेले शिक्षण पुन्हा सुरू व्हावे म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न केवळ अनुकरणीय आहेत. जिद्द होती म्हणूूनच त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पदव्युत्तर शिक्षणापर्यंत पोहचल्या.
आणि अजूनही त्या स्पर्धा परीक्षांनाही सामोऱ्या जात आहेत. केवळ ध्यास घेतल्यामुळेच हे शक्य झाले. त्यांचे माहेर मुंबई. लग्न झाल्यावर त्या म्हसवडमध्ये आल्या. सासरी चर्मोद्योगाचा पारंपरिक व्यवसाय. चमड्याचे काम करायचे आणि मिळणाऱ्या उत्पन्नात गुजराण करायची. पतीसह घरी सासू, एक मुलगा, एक मुलगी असे कुटुंब. आर्थिक विवंचना तर होत्याच. काही तरी केले पाहिजे, असे वाटत असतानाच माणदेशी फाउंडेशनची माहिती समजली. त्यात शिवणकाम प्रशिक्षण करण्याचे ठरविले. ते पूर्ण केले. पण शिलाई मशीन घ्यायला पैसे नव्हते. पतीने नकार दिला. चर्मोद्योगातील माल विक्रीसाठी ते मुंबईला गेले असताना पूनम यांनी सासू व मुलांना बरोबर घेऊन माणदेशीचे कार्यालय गाठले. एका दिवसात कर्ज मिळवून मशीन घरी आणली.
या धाडसामुळे कुटुंबाला हातभार सुरू झाला. त्याचदरम्यान माणदेशीने म्हसवडमध्ये नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू केले. त्यांच्या मनात शिक्षणाची उर्मी जागी झाली. मुक्त विद्यापीठाच्या पहिल्याच तुकडीत त्यांनी प्रवेश घेतला. तिथून त्या बी. ए. झाल्या. दहिवडी कॉलेजमधून त्यांनी एम. ए. केले. कॉम्प्युटरचा बेसिक कोर्स केला. वय वाढत चाललं तरी बघा अजून शिकतीय, अशी टीका ऐकू येऊ लागली. पण त्या डगमगल्या नाहीत. पती व सासूचा पाठिंबा होता.
शिवणकाम करीत स्वतःच्या संसाराला हातभार लावत शिक्षणाची आस त्या पूर्ण करीत होत्या. तलाठी परीक्षा दिली. एमपीएससीची प्रिलिमिनरी परीक्षा दिली. स्टेट बॅंकेची परीक्षा दिली. शिक्षणाला किंमत आहे, याची जाणीव असल्यानेच पुन्हा एलएल.बी. प्रवेश परीक्षा दिली, असे त्या सांगत होत्या. एलएल. बी. ला त्यांना प्रवेशही मिळत होता. परंतु, फीची रक्कम ऐकून त्यांनी प्रवेश घेतला नाही. ड्रेस, ब्लाऊज असे शिवणकाम सुरू असतानाच नाशिकच्या मुक्त विद्यापीठाकडे शिक्षक होण्यासाठी त्यांनी अर्ज केला. त्याला मान्यता मिळाली. आणि म्हसवडच्या केंद्रात त्या प्राध्यापिका झाल्या.
शिकविण्याचे आवडीचे काम त्यांना मिळाले. त्याचा आनंद त्यांना मिळू लागला. त्यांच्या कष्टामुळे त्यांना नुकतीच केंद्र संयोजक म्हणूून जबाबदारीही मिळाली आहे. इतरांनाही शिक्षणासाठी त्या प्रवृत्त करीत आहेत. त्यांचे पती दहावी अनुत्तीर्ण होते. तेही आता मुक्त विद्यापीठातून पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. मुलगा साताऱ्यात इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. मुलगी कराडमध्ये शिकते आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे. मुक्त विद्यापीठाच्या केंद्रात सुमारे 500 विद्यार्थी शिकत आहेत. चार सहकाऱ्यांसमवेत त्या शिकवत आहेत. त्यात 70 टक्के महिलांना शिकवायला मिळते, पैसे खूप जण मिळवतात. पण आईला पदवीधर करण्याचे काम खूप आनंदाचे आहे, असे त्या सांगत होत्या. घरी भरपूर सुबत्ता आहे, शिकून काय करायेचय असे विचारणाऱ्या महिलाही भेटतात. पण आपले अडाणीपण दूर करा असे सांगून त्या शिक्षणासाठी आग्रह धरतात.
अनेक अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यासह काही डॉक्टर्स, नर्सेस, रानात कामाला जाणाऱ्या अशा महिला इथे शिकतात. माणदेशी या महिलांना इथे मोफत प्रवेश व जाण्यायेण्याचा खर्चही देते. करोना काळात ऑनलाइन शिक्षण त्यांनी दिले. एका जवानाने देशाच्या सीमेवरून ऑनलाइन परीक्षा दिल्याचेही त्यांनी सांगितले. पूनम यांना दर रविवारी ही जबाबदारी पार पाडावी लागते. त्याशिवाय माणदेशीच्या हेल्थ कॅंम्पसाठी त्या काम करतात.
माणदेशीमार्फत महाराष्ट्राच्या विविध भागांत महिलांच्या आरोग्यासाठी शिबिरे होतात. त्यात डॉक्टराना त्या सहकार्य करतात. डॉ. हसुमती छेडा व डॉ. माधुरी संगोई (मुंबई) यांच्याकडून त्या शिकल्या. त्यानुसार महिलांचा बीपी पाहणे, शुगर तपासणे असे काम त्या करतात. महिलांना आरोग्य कार्ड देतात. शिवणकाम, आरोग्य शिबिर आणि माणदेशीच्या 16 शाखांतील स्टेशनरीचे काम त्या पाहतात. कुटुंबाला आर्थिक स्थिरता देताना त्यांनी यापूर्वी डमरू, दुमड्या अशी वाद्ये बनविली.
आणि आता शिक्षणाच्या बळावर त्या स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. माणदेशीच्या संस्थापिका चेतना सिन्हा, अधिकारी रेखा कुलकर्णी व वनिता शिंदे यांनी नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे त्या आवर्जून सांगतात. शिक्षणाचे महत्त्व जाणून त्यातून खरा आनंद शोधणारी ग्रामीण भागातील महिला मेहनतीने उभी राहिली, आपल्याबरोबरच इतरांनाही प्रोत्साहन देण्याची भूमिका घेते, हे खूपच वेगळे आणि प्रेरक उदाहरण आहे.