सातारा – आमनेसामने राजकीय संघर्ष करण्याची धमक राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाही. माझा पिंड संघर्षाचा आहे. मला कोणी थांबवू शकत नाही. माझ्यावर राजकीय आकसातून दाखल झालेल्या गुन्ह्यांमागे राष्ट्रवादी आहे. मायणी मेडिकल कॉलेजचे विश्वस्त एम. आर. देशमुख हे केवळ निमित्त आहे. मी कोणाला घाबरणारा नाही. राष्ट्रवादीच्या षडयंत्राला जशास तसे उत्तर देणार, असा घणाघात आ. जयकुमार गोरे यांनी शनिवारी केला.
एक दिवस माझे निर्दोषत्व नक्कीच सिद्ध होईल; परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एवढ्या हिणकस पातळीवर जाऊन राजकारण करू नये. पोलिसांनी माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात जी तत्परता दाखवली, तीच तत्परता मायणी मेडिकल कॉलेजच्या गैरव्यवहार प्रकरणात दाखवावी. राजकीय दबावाखाली पोलिसांनी तपास करू नये. आपला सचिन वाझे होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही गोरे यांनी केले.
वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या बनावट नोटीस प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाल्यावर आ. गोरे यांना शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आरोप केले. माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील पाटील, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, मायणी मेडिकल कॉलेज मी चालवायला घेतले नव्हते. तशी माझी इच्छा नव्हती. कॉलेजचे विश्वस्त एम. आर. देशमुख माझ्याकडे आले. ते प्रचंड अडचणीत असून मी कॉलेज चालवायला घ्यावी, अशी विनंती सहा महिन्यांपासून करत होते. संस्था कर्जबाजारी होती. कॉलेजला एमबीबीएस अभ्यासक्रमांची, बांधकाम परवानगी नव्हती. तरीदेखील साडेनऊशे विद्यार्थ्यांना ऍडमिशन देण्यात आली.
यापोटी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 ते 50 लाखांपर्यंत फी गोळा करून संबंधित ट्रस्टने 68 ते 70 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला. प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांचे बोगस शिक्के बनवून विद्यार्थ्यांचे प्रवेश पात्र ठरण्यासाठी, सीबीएससी बोर्डाच्या बोगस गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे बनवण्यात आली. कॉलेजसाठी साडेचौदा कोटी रुपयांचे कर्ज एचडीएफसीकडून घेतले, पण मेडिकलचे साहित्य खरेदी करण्यात आले नाही. कॉलेजच्या उभारणीत गुंतागुंत आहे.
कॉलेजवर दीडशे कोटी रुपयांचे कर्ज आहे. असे असताना आम्ही त्यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी दाखल केले याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने कॉलेजला 20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून नव्या मॅनेजमेंटच्या अटीवर आम्ही कॉलेज चालवायला घेतले. आयुष्यात पहिल्यांदा मी स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन कॉलेजची देणी देण्याचा प्रयत्न केला; परंतु देशमुखांनी कर्जे करायची आणि ती मी फेडायची, असे होणार नाही. प्रत्येक गैरव्यवहाराचा हिशोब झालाच पाहिजे. या प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी होण्याची मागणी मी केली आहे. या प्रकरणी दीड वर्षापूर्वी तक्रार करूनही जिल्हा पोलिसांनी तपास केला नाही.जमिनीच्या बोगस दस्तासंदर्भात बोलताना आ. गोरे म्हणाले, या प्रकरणांमध्ये माझी सही व शपथपत्र असल्याचे खोटे आहे. यात मी दोषी सिद्ध झालो, तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन. मूळ तक्रारदार गरीब असून, त्याचे नुकसान होईल असे वर्तन आम्ही केलेले नाही.
त्याची तक्रार करण्याची इच्छा नव्हती; परंतु या प्रकरणात मला अडकवण्यासाठी तक्रारी दाखल केल्या जात आहेत. मात्र, आता मी गप्प बसणार नाही. माझ्या मेहुणीवर पहाटे 4 वाजता गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी सकाळी 7 वाजता मुंबईत पोहोचणारे पोलीस मायणी मेडिकल कॉलेजच्या बोगस प्रकरणी दीड वर्ष होऊनही तपास का करत नाहीत? माझा पक्ष माझ्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे. या प्रकरणात मी आजपर्यंत तडजोड केलेली नाही.
प्रभाकर घार्गे हे माझे कट्टर विरोधक असूनही माणुसकीच्या नात्याने मी त्यांना भेटायला कारागृहात गेलो होतो. खा. रणजितसिंह म्हणाले, आम्हा दोघांवर तक्रार करण्याचा एकच मुहूर्त काढण्यात आला. माझ्यावर तब्बल 40 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात पाच लिटर पेट्रोल चोरीचा गुन्हासुद्धा आहे. माझ्यावर उरल्यासुरल्या सर्व कलमांचे गुन्हे दाखल केल्यास त्यांची संख्या शंभर होईल. “त्यांच्या’त दम असेल, तर त्यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक माझ्याविरुद्ध लढवून दाखवावी.