मुंबई – राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात चुरस असल्याचे दिसून येत असून शिवसेनेने दुसरी जागा लढवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दुसरीकडे अपक्ष म्हणून राज्यसभेच्या रिंगणात उतरलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची भेट घेतली. यामुळे तर्क-विर्तक व्यक्त केले जात आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यात राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी होईल. तर, सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे आहे. त्यात शिवसेनेने आधीच सहाव्या जागेवर दावा केला आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून चार माजी खासदाराची नावे चर्चेत आहे. यात चंद्रकांत खैरे, शिवाजी आढळराव-पाटील, अनंत गीते आणि आनंदराव अडसूळ यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या चारही नेते गेल्या लोकसभेत पराभूत झाले आहेत, त्यामुळे एकाला राज्यसभेवर संधी देण्याचा शिवसेनेचा विचार आहे.
दुसरीकडे भाजपही सहाव्या जागेसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. भाजपने जर हा उमेदवार रिंगणात उतरवल्यास फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळू शकते. त्यामुळे सहाव्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच आणि राजकारण पाहायला मिळू शकते.
सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार होते. शिवसेनेचे आमदार रमेश लटकेचे निधन झाल्याने ती संख्या 168 आहे. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, कॉंग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असे महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष पाच आमदार असे एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 168 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो.