भोर/ कापूरहोळ – भोर तालुक्यातील भाटघर धरणात बुडून पाच विवाहित महिलांचा मृत्यू झाला तर एका मुलीला वाचविण्यात यश आले. ही दुर्घटना (दि.19) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. या पाचही जणी पुण्यातील रहिवासी आहेत. त्या पाहुण्यांकडे आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर काळाने झडप घातली. यापूर्वी धरणात बोट उलटून 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही मोठी दुर्घटना आहे.
घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबू लंकेश रजपूत (वय 19, रा बावधन), मनीषा लखन रजपूत (वय 20), चांदनी शक्ती रजपूत (वय 21), पूनम संदीप रजपूत (वय 22, तिघीही रा. संतोषनगर, हडपसर पुणे) मोनिका रोहित चव्हाण (वय 23, रा नऱ्हे, पुणे), अशी मृत्यू महिलांची नावे आहेत. यातील खूशबू आणि चांदनी यांचे मृतदेह अजून मिळालेली नाहीत, उर्वरित तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत.
दरम्यान, धरणात एकूण सहाजण बुडाले होते. त्यातील एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. भाटघर धरणालगतच्या नऱ्हे गावच्या हद्दीत सायंकाळी दुर्घटना घडली. नऱ्हे गावातील कातकरी समाजाच्या तरुणाने तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. घटनास्थळी राजगडचे पोलीस दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.
राजगुरूनगर : चासकमान धरणात दहावीच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये दोन मुलींचा समावेश