औरंगाबाद : राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या औरंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीचे पर्यटन पुढील पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. औरंगजेब कबर समितीने मागणी केल्यानंतर पुरातत्व विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पर्यटकांना औरंगजेबाच्या कबरीवर जाण्यास निषिद्ध असणार आहे.
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेऊन फुले वाहिली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरुन महाराष्ट्रात राजकारण सुरु आहे. ही कबर कशाला असा प्रश्न मनसेने उपस्थित केल्यानंतर तिथला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बॅरिकेड्स देखील लावण्यात आले आहेत.
सध्याची एकंदर परिस्थिती पाहता ही कबर काही दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात यावी, अशी विनंती औरंगजेब कबर समितीने पुरातत्व विभागाला केली. या विनंतीचा विचार करुन पुरातत्व विभागाने ही कबर पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना इथे जाता येणार नाही.
औरंगजेब कबर समितीने पुरतत्व विभागाला विनंती करण्याचं कारण म्हणजे ही कबर आणि आजूबाजूचा परिसर पुरतत्व विभागाच्या अखत्यारित येतो. दरम्यान, औरंगजेबाची कबर हा विषय सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चिला जात आहे.