दौंड तालुक्यातील शेतकरी कोमात अन् व्यापारी जोमात
तुकाराम कतुरे
मलठण – महाराष्ट्र राज्य हे कांदा उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहे. खरीप, रांगडा आणि रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा या तिन्ही हंगामात हे पीक विविध जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. परंतु बाजारपेठेत कांद्याला सध्या 4 ते 12 रुपये किलोपर्यंत खूपच नीचांक्की दर मिळत आहे. या दरात कांदा विकून शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्च सुद्धा शिल्लक राहत नाही. त्यामुळे कांदाचाळी उभारणी करुन शेतकरी साठवणूक करीत आहे.
राज्यात सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढत आहे. त्यामुळे भाज्यांना पुरेसा पाणीपुरवठा मिळत नाही. त्यामुळे बाजारात येणारी भाज्यांची आवक कमी होऊन त्यांचे दरही वाढले आहेत. मात्र एका बाजारात ही परिस्थिती असताना शेजारच्याच कांदा बाजारात मोठी आवक होत आहे. आवक वाढली असली तरी मालाला हवा तसा उठाव मिळत नाही. बाजारात ग्राहक नसल्याने बराच माल पडून आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला घाऊक बाजारात कांद्याचे दर 12 ते 15 रुपये किलोपर्यंत होते. तर, किरकोळमध्ये ते 30 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र आत्ता घाऊक बाजारात कांदा 10 ते 13 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कांदा 20 रुपये किलोच्या घरात आहे.गेल्या वर्षी समाधानकारक झालेल्या पावसामुळे कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.
दौंड तालुका उसाचे आगार मानले जात असले तरी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. उसामध्ये आंतरपीक म्हणून कांदा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या बाजारपेठेत महागाईचा भडका उडाला आहे. शेतकऱ्यांना कांदा उत्पादित करण्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामध्ये खते, बी बियाणे, औषधांचा समावेश होतो. मजुरी देखील वाढली आहे.
पिकवणारा कोमात अन् घेणारा जोमात
शेती गावागावांत मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा उपयोग होतो. डिझेलचे दर वाढल्यामुळे नांगरणी, काकरणे, रोटावेटर मारणे, पेरणीचे एकरी मशागतीचे दर दुप्पट झाले आहेत. त्यामुळे शेतकरी अगोदरच त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांकडून 4 ते 10 रुपयांनी घेतलेला कांदा शहरात मात्र 14 ते 15 रुपयांनी विकला जात आहे. यामुळे पिकवणारा कोमात आणि घेणारा जोमात अशी अवस्था सध्या सर्वत्र दिसून येत आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादीत झाला आहे. त्यामुळे बाजारभाव कोसळले आहेत. परिणामी उत्पादन खर्चावर आधारित कांद्याला शासनाने योग्य हमीभाव दिला पाहिजे आणि कांदा निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
– गोरख रसाळ, कांदा उत्पादक शेतकरी, बोरीबेल
नाफेड कमी दराने म्हणजे 7 ते 9 रू किलोने कांदा खरेदी करत आहे. कमी प्रमाणात उत्तम प्रतवारीचा निवडक माल खरेदी करत आहे. म्हणजे सरकार सुद्धा शेतकऱ्यांचा विचार करीत नाही. सध्या बाजारपेठेत कांद्याला खूपच कमी मागणी आहे. बाजारात पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा कांद्याच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे.
-रेवणसिद्ध भरते, कांदा व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे