विश्वासावरच ही जगरहाटी चालली आहे. विश्वास हा व्यवहाराचा अविभाज्य भाग आहे, हेही स्पष्टच आहे; परंतु या सगळ्यामध्ये आत्मविश्वास कुठे बसतो?
विख्यात अमेरिकन टेनिसपटू व्हिनस विल्यम्स म्हणते, “तुमच्याबद्दल जेव्हा कुणीही खात्री देत नसतं तेव्हा तुमचा स्वत:वर गाढ विश्वास असायला हवा-त्याच क्षणी तुमच्यात विजेता(ती) निर्माण होतो(ते).’
आत्मविश्वास इतका महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण काही तरी नक्की करू शकतो, असं मनोमन वाटतं तेव्हा आत्मविश्वास निर्माण होतो. मला 1993 मधील हीरो कप अंतिम सामन्यातलं शेवटचं षटक आठवतंय. दक्षिण आफ्रिकेला या शेवटच्या षटकात फक्त 5 धावा हव्या होत्या. श्रीनाथ, कपिल देव आणि मनोज प्रभाकर हे महत्त्वाचे गोलंदाज खेळत असूनही तोपर्यंत एकही षटक गोलंदाजी न केलेल्या तेंडुलकरनं ते षटक टाकलं आणि भारत 2 धावांनी विजयी झाला.
वेगळाच गोलंदाज वापरून प्रतिस्पर्धी फलंदाजांना कोड्यात टाकायचा हा कप्तान अझरुद्दीनचा डावपेच नक्कीच होता; पण तितकाच महत्त्वाचा तेंडुलकरचा आत्मविश्वास मानावा लागेल. लक्षात घ्या. अंतिम सामना, शेवटचं षटक, विजयासाठी फक्त 5 धावा (म्हणजे अगदीच किरकोळ आव्हान), आतापर्यंत सामन्यात एकही षटक न टाकलेला तेंडुलकर-या सगळ्या गोष्टी विजयाची शून्य खात्री देत असताना ते आव्हान स्वीकारायला केवढा मोठा आत्मविश्वास हवा! व्हिनस विल्यम्सच्या विधानाची सत्यता इथे पटते!
एके काळी भारतीय संघात डावाची सुरुवात करायला भारतीय फलंदाज कचरत असत कारण प्रतिस्पर्धी गोलंदाजी तुफान वेगवान असे. अशा काळातच तेंडुलकरनं सलामीची फलंदाजी मागून घेतली. केवढा हा आत्मविश्वास! तीच गोष्ट कपिल देवच्या 1983च्या विश्वकरंडकाच्या विजेतेपदाची. कुणाचाही विश्वास नसताना विजयश्री खेचून आणणं अशा क्रीडानायकांच्या आत्मविश्वासामुळेच शक्य झालं. प्रचंड आत्मविश्वास असल्यानंच केवळ दोन ते तीन मिनिटांच्या भाषणानं अब्राहम लिंकननं अमेरिकन सैन्यामध्ये वीरश्री चेतवली आणि पराभवाच्या दाढेतून विजयश्री खेचून आणली.
अशाच आत्मविश्वासानं तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी अंतिम विजय आपलाच आहे अशी गगनभेदी गर्जना करून जनतेत स्वाभिमानाचे स्फुल्लिंग निर्माण केले आणि अखेर विजय मिळवून दिला. या घोषणेदरम्यान त्यांनी दोन बोटांनी इंग्रजी “व्ही’ अशी विजय दर्शवणारी जी खूण केली ती आजही विजेते वापरताना दिसतात.
आत्मविश्वास गमावण्याची अनेक कारणं असू शकतात. जवळपासच्या माणसांनी कायम टोचून बोलणं, आपल्या हातून एखादी घोडचूक घडली असेल तर अपराधीपणाची भावना मनात कायमची घर करून बसणं इत्यादी कारणं नेहमी दिसून येतात.
माझा स्वत:चा अनुभव सांगतो. शाळेत-कॉलेजात मी खूप बारीक अंगकाठीचा होतो. वडिलांचे मामा एकदा घरी आले असताना म्हणाले, “गड्या, तू पोक काढून अन् वाकून का चालतोस? जरा छाती पुढे काढून चाल की!’ पण बारीक असण्याचा न्यूनगंड असल्यानं तसं होणं नव्हतं. नोकरीत असेपर्यंत हीच परिस्थिती राहिली. पण मग लक्षात आलं की आपल्यामध्ये मुळातच समस्या सोडविण्याचे गुण आहेत.
त्यामुळे मी सर्वत्र वॉंटेड (चांगल्या अर्थानं!) झालो.
माझा आत्मविश्वास एकदम वाढला. मी इतरांच्या डोळ्यात डोळा घालून बोलू लागलो. माझा मान वाढला. मात्र हा आत्मविश्वास मी कधीही डोक्यात जाऊ दिला नाही. हां, कुणी वाचाळ, अज्ञानी माणूस जर मला शहाणपणा शिकवू लागला तर मात्र मी त्याला जागा दाखवून देण्यास कमी करीत नाही. बोले तैसा चाले-आपण जे बोलतो तसं वागलं की आत्मविश्वास वाढीला निश्चितच मदत होते. लोकांचा आपल्यावर विश्वास बसायला लागला की आपोआप आपल्या आत्मविश्वासात वृद्धी होते. नाहीतर. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण! आपलं म्हणणं किती पोकळ आहे ते लोकांना कळून चुकलं की विश्वासाला आणि पर्यायानं आत्मविश्वासाला तडा गेलाच म्हणून समजा.
आत्मविश्वास आणि अहंकार यातील रेषा धूसर आहे. आपण अहंमन्य गणले जात नाही ना याची काळजी घेणं आवश्यक आहे. या मर्यादेत राहिल्यास आत्मविश्वासानं अनेक अवघड कार्य साध्य होऊ शकतात.
– श्रीनिवास शारंगपाणी