समाजाने दूर अंध:कारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका, राजकुमारी डॉ. इंदुताई पटवर्धन यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म जमखिंडीच्या राजघराण्यात 14 मे 1926 रोजी झाला.
इंदुताईंचे शिक्षण जमखिंडी व कोल्हापूर येथे झाले. राजकुमारी म्हणून जन्मलेल्या इंदूताईंनी 16व्या वर्षी गांधीजींच्या चळवळीस वाहून घेतले. मॉंटेसरी शिक्षणक्रम पूर्ण करून त्या सेंट कोलंबो स्कूलमध्ये शिक्षिका बनल्या. पुढे ब्रिटिश इंडियन रेड क्रॉस आणि सेंट जॉन ऍम्ब्युलन्सच्या कामामध्ये दाखल झाल्या. दुसऱ्या महायुद्धातत्या प्रत्यक्ष युद्धभूमीवर जखमी लष्करी जवानांचे शुश्रुषेसाठी ब्रह्मदेश, जावा येथे गेल्या. सिंगापूर, जपान, येथेही त्यांनी काम केले. वर्ष 1953 मध्ये सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी होमिओपॅथीचे शिक्षण घेतले. खेड शिवापूर येथे दवाखाना सुरू केला. पूना विमेन्स काउंसिलचे कामही त्या करीत होत्या. पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या त्या संस्थापक-सदस्या होत्या. लष्करातील जवान व आदिवासी समाजातील आजारी, जखमी रुग्णांची सेवा करत त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यासाठी त्या जन्मभर अविवाहित राहिल्या.
मुंबई इलाख्यात आपले जमखंडी संस्थान विलीन करणारे त्यांचे भाऊ राजा परशुराम शंकरराव पटवर्धन हे भारतीय राजघराण्यांपैकी पहिले संस्थानिक होते. पुणे येथील पूना कॉलेजला सर परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या स्मरणार्थ दोन लाख रुपये इतकी देणगी त्यांनी दिली होती व तेव्हापासून ते कॉलेज सर परशुरामभाऊ कॉलेज (एस. पी. कॉलेज) म्हणून ओळखले जाऊ लागले.
ऑक्सफॉम या संस्थेकडून 1961 साली मिळालेल्या 17 हजार रुपयांच्या मदतीवर पुण्याजवळच्या डुडळगाव येथील एका ओसाड जागेवर “आनंदग्राम’ नावाने कुष्ठरोग्यांची वसाहत उभी केली. पश्चिम महाराष्ट्रात पुण्याजवळ कुष्ठरोग सेवाकेंद्र सुरू करणाऱ्या त्या पहिल्या महिला कार्यकर्त्या आहेत. वर्ष 1965 मध्ये महाराष्ट्र शासनाचा भिक्षा प्रतिबंध कायदा अमलात आल्यावर त्यांनी 80 रुग्णांसह कुष्ठरोग्यांसाठी प्रत्यक्षात वर्ष 1965 मध्ये काम सुरू केले. आळंदी जवळच्या सध्याच्या “आनंदग्राम’ येथे वर्ष 1970 मध्ये त्यांनी स्थलांतर केले.
उला लेडी हाइड पार्कर, राधा रमणजी अशा व्यक्तींच्या सहाय्यामुळे “आनंदग्राम’ला सध्याचे विशाल स्वरूप आल्याचा त्या कृतज्ञतेने उल्लेख करतात. सध्या आश्रमात राहणाऱ्यांकडून येथे शेती, कुक्कुटपालन, गोपालन, कापड उद्योग आदी अनेक उपक्रम यशस्वीपणे चालविले जातात. रेशमासाठी तुती इत्यादीची लागवड केली जाते. मुला-मुलींनी फुलून आलेल्या शाळा, शेतीला नियोजन करून दिलेले पाणी, सदैव कार्यरत असलेले हात, हे आनंदग्रामचे आजचे आदर्शवत ठिकाण झाले आहे. खाद्यतेल सोडले तर सर्व काही इथेच बनते, धान्य पिकते, हातमागावर कपडे तयार होतात, दवाखाना, केशकर्तनालय इथे आहे. गोबर गॅस बनतो. इतके स्वयंपूर्ण गाव येथे त्यांनी उभे केले.
इंदुताई पटवर्धन यांच्या कार्याची दाखल घेऊन शासनाने त्यांना दलितमित्र हा पुरस्कार दिला. 8 फेब्रुवारी 1999 रोजी त्यांचे निधन झाले.