भारताकडे अणुसाहित्य निर्यातीस बंदी
ओटावा, दि. 13 – कॅनेडियन सरकारच्या उद्योग व व्यापार खात्याने असे जाहीर केले आहे की, भारताकडे अणुशक्ती संशोधनाचे साहित्य निर्यात करण्यात येणार नाही. अर्थात, ही बंदी औपचारिक आहे. कारण गेल्या मे महिन्यात भारताने जेव्हा अणुस्फोट केला तेव्हापासून भारताकडे अणुसाहित्य रवाना करणे थांबविण्यात आलेच होते.
तेजस्वी तरुण निर्माण करणारे चित्रपट हवेत
मिरज – आजच्या सुशिक्षित तरुणांनी असे चित्रपट पाहावेत की, ज्या चित्रपटांमुळे पौरुष, जिद्द निर्माण होईल. तेजस्वी तरुण निर्माण होतील. आता प्रेमगीते नकोत राष्ट्रीय गीते हवीत. कबीर, तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे अभंग आपल्या तोंडी आले पाहिजे, असे उद्गार प्रसिद्ध सिनेनट शाहू मोडक यांनी काढले.
वाचक व संपादक यांचे दरम्यान संवाद प्रस्थापित होणे जरूरी
कोल्हापूर – वाचक वर्ग व संपादक यांच्यामध्ये एक प्रकारचा संवाद निर्माण होण्याची गरज आहे, असे विचार रसरंगचे पोतनीस यांनी वृत्तविद्या विभागात विद्यार्थ्यांबरोबर केलेल्या चर्चेत व्यक्त केले. हल्लीच्या काळात इंग्रजी वाचन कमी होत आहे याबद्दल खेद व्यक्त करून ते म्हणाले, पत्रकार होऊ इच्छिणाऱ्यास सतत लेखन व वाचन या सवयी हव्या असणे जरुरीचे आहे.