नवी दिल्ली – आयपीएलचा 15वा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडू खेळत आहे. या स्पर्धेनंतर 9 जूनपासून भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार असून टी-20 विश्वचषकाची पूर्वतयारी करणार आहे. तत्पूर्वी आयपीएलदरम्यान भारतीय खेळाडूंना दुखापती झाल्या असल्याने भारतीय संघाच्या समस्या वाढल्या आहेत.
दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येणार असून दोन्ही संघात 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यासाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निश्चित करण्यासाठी निवडकर्ते 23 मे रोजी कर्णधार रोहित शर्मासोबत बैठक घेणार आहेत. मात्र, निवडकर्त्यांसमोर एक मोठी डोकेदुखी असेल कारण तब्बल पाच खेळाडू दुखापतग्रस्त, तर तीन जण फॉर्ममध्ये नाहीत. तसेच विराट कोहलीला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
भारतीय संघातील रवींद्र जडेजा, दीपक चहर आणि सूर्यकुमार यादव हे जखमी असून त्यांचे खेळणे संशयास्पद बनले आहेत. तर वॉशिंग्टन सुंदर आणि टी. नटराजन हे तंदुरुस्त आहेत, पण निवडकर्ते धोका पत्करू इच्छित नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात जडेजाला दुखापत झाल्याने तो आयपीएलच्या उर्वरित सामन्यातून बाहेर पडला आहे.
तसेच सूर्यकुमार यादवला देखील दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सच्या उर्वरित सामन्यातून बाहेर बसणे भाग पडले आहे. दुसरीकडे, दीपक चहर अजूनही आपल्या दुखापतीतून सावरलेला नाही. यामुळे बोर्ड दीपकचे मालिकेतून बाहेर राहणे निश्चित आहे. दुसरीकडे, ज्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे त्यांची यादीही मोठी आहे. मोहम्मद शमी व्यतिरिक्त विराट कोहली हा एक उमेदवार आहे.
गुजरात टायटन्स आधीच आयपीएल 2022 प्लेऑफसाठी पात्र ठरल्यामुळे, शमीला काही सामन्यांसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तर निवडकर्ते संभाव्य विश्रांतीबाबत कोहलीशी चर्चा करू शकतात. परिणामी, टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघासमोर खेळाडूंची दुखापत ही मोठी समस्या ठरू शकते.
तथापि, रोहित शर्मा हा दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी नेतृत्व करण्यासाठी उपलब्ध असेल. आयपीएलनंतर त्याने ब्रेक घेतल्याची चर्चा होती. पण मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र ठरला नसल्यामुळे त्याला एक आठवड्याचा ब्रेक मिळेल.