नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश पूर्ण सुरक्षित आहे. कॉंग्रेसने कुठलीही काळजी करू नये, असा पलटवार भाजपकडून करण्यात आला.
कॉंग्रेसच्या चिंतन शिबिराचा प्रारंभ करताना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्या टीकेला भाजपचे नेते अनिल बलुनी यांनी प्रत्युत्तर दिले. जनतेशी आणि वास्तवाशी असलेली कॉंग्रेसची नाळ तुटली आहे. देशातील जनता सातत्याने भाजपला कौल देत आहे.
त्यामुळे जबाबदार विरोधी पक्ष म्हणून कसे वागावे याबाबत कॉंग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती आहे. त्या पक्षाने देशाविषयी चिंतन करण्याऐवजी स्वत:च्या राजकीय अस्तित्वाबाबत आत्मचिंतन करावे, असा शाब्दिक टोला त्यांनी लगावला. मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथाकडे वाटचाल करत आहे. देशाची काळजी घेण्यास मोदी सरकार समर्थ आहे.
त्यामुळे सोनियांनी त्यांच्या पक्षाला पुनरूज्जीवित करण्याकडे लक्ष केंद्रित करावे, असा उपहासात्मक सल्लाही बलुनी यांनी दिला.