जयपूर – राजस्थानमधील उदयपूर येथे शुक्रवारपासून (13 मे) काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर सुरू झाले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी 400 हून अधिक प्रतिनिधी आणि नेते उदयपूरला पोहोचले आहेत. या शिबिरात पक्षाने संघटना बदलाचे काही मोठे निर्णय घेतले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन म्हणाले की, एक कुटुंब, एक तिकीट यावर काँग्रेसचे एकमत झाले आहे. अधिवेशनानंतर पक्षात मोठे संघटनात्मक बदल करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अजय माकन म्हणाले की, एका कुटुंबातील एका सदस्यालाच तिकीट द्यावे, यावर पॅनेलचे सर्व सदस्य पूर्णपणे सहमत आहेत. कोणत्याही नेत्याच्या कुटुंबातील अन्य सदस्याने किमान पाच वर्षे पक्षात काम केले असेल तरच काँग्रेस त्याला तिकीट देईल. मात्र, गांधी घराण्याला या नियमातून सूट मिळू शकते, कारण गांधी कुटुंबातील सर्व सदस्य 5 वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत. प्रियांका गांधी यांनी 2018-19 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता, त्यामुळे त्या पुढील निवडणूकही लढवू शकतील.
5 वर्षांपेक्षा जास्त काळ पद मिळणार नाही –
अजय माकन यांनी सांगितले की, पक्षातील कोणताही नेता 5 वर्षांपेक्षा जास्त काळ कोणतेही पद भूषवणार नाही. एखाद्या नेत्याला पुन्हा पदावर आणायचे असेल, तर त्याच्यासाठी किमान 3 वर्षांचा कूलिंग पीरियड आवश्यक असेल. चिंतन शिबिरात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देताना अजय माकन म्हणाले की, पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी काँग्रेस ‘असेसमेंट विंग’ स्थापन करण्याचा विचार करत आहे. आता प्रत्येक स्तरावर किमान 50 टक्के तरुणांना संघटनेत सामावून घेण्याचा निर्णय काँग्रेसने शिबिरात घेतला आहे.
मंडल समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव –
काँग्रेस सरचिटणीस माकन म्हणाले की, ब्लॉक आणि बूथ समित्यांमध्ये मंडल समितीच्या स्थापनेवर पक्ष एकमत आहे. एका मंडल समितीमध्ये 15 ते 20 बूथ असतील. ग्राउंड लेव्हल सर्व्हे आणि इतर अशा कामांसाठी पक्षात ‘पब्लिक इनसाइट डिपार्टमेंट’ तयार करण्याचा प्रस्ताव आहे. यासोबतच काँग्रेसमध्ये 6 गट तयार करण्यात आले असून, ते संघटना, देशाची आर्थिक आणि राजकीय स्थिती, सामाजिक न्याय, शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न मांडणार आहेत. प्रत्येक गटात 60 ते 70 लोक असतील.
काँग्रेस पक्षाच्या रचनेत बदल नाही –
काँग्रेस सरचिटणीस म्हणाले की, शिस्तीची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत संघटनेत चर्चा झाली आहे. संघटनेतील शिस्त आणखी बळकट करण्यासाठी कोणती पावले उचलावीत, यावरही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अजय माकन म्हणाले की, काँग्रेस ही पक्षाची संघटना आहे, ज्यामध्ये तुम्हाला खालपासून वरच्या स्तरापर्यंत मोठा बदल दिसेल. ते म्हणाले की काँग्रेस पक्षाची संघटनात्मक रचना बदलत्या काळानुसार बदललेली नाही.
काँग्रेसमध्ये संरचनात्मक सुधारणांची गरज –
त्याचवेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंतनशिबिरात संबोधित करताना सांगितले की, हे शिबिर म्हणजे भाजप-आरएसएसच्या धोरणांमुळे देशासमोरील आव्हानांवर चिंतन करण्याची चांगली संधी आहे. हे देशाच्या प्रश्नांवर चिंतन आणि पक्षाच्या समस्यांचे आत्मपरीक्षण आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की, काँग्रेसमध्ये संरचनात्मक सुधारणांची नितांत गरज आहे.
शिबिरात सोनिया गांधी म्हणाल्या की, असे वातावरण निर्माण झाले आहे की लोक सतत भीती आणि असुरक्षिततेत जगत आहेत. अल्पसंख्याकांना क्रूरतेने लक्ष्य केले जात आहे. अल्पसंख्याक हे आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहेत आणि ते आपल्या देशाचे समान नागरिक आहेत. सोनिया म्हणाल्या की, आपल्याला लढायचे आहे आणि जिंकायचे आहे. आम्ही पक्षाला पूर्वीच्याच स्थितीत आणू. आपल्याला पुन्हा एकदा धैर्य दाखवण्याची गरज आहे. आमच्याकडून जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्याबाबत आम्ही गाफील नसल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या. आम्ही नम्रतेने आत्मपरीक्षण करत आहोत, आम्हाला आशा आहे की आम्ही जेव्हा येथून निघू तेव्हा एका नवीन उर्जेसोबत निघू.