नवी दिल्ली – इंधन दरवाढीने सामान्य माणूस हैराण झाला असून केंद्र सरकारने इंधनावर भरमसाठ पद्धतीने वाढवलेले उत्पादन शुल्क त्वरीत कमी करून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केंद्र सरकारकडे केली आहे.
या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. हे दर आजवरच्या सर्वोच्च पातळीवर गेले आहेत. या संबंधात बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी सांगितले की, कॉंग्रेसने सन 2014 साली जेव्हा सत्ता सोडली त्यावेळी कच्चा तेलाचे दर 108 डॉलर्स प्रतिपिंप इतके होते.
त्यावेळी आमच्या सरकारने 71 रूपये 51 पैसे दराने पेट्रोल आणि 57 रूपये 28 पैसे दराने डिझेल पुरवले. पण आज कच्चा तेलाच्या किंमती त्यावेळेपेक्षा निम्म्याने खाली आल्या असतानाही आज आपल्याला 85 रूपये 70 पैसे दराने पेट्रोल आणि 75 रूपये 88 पैसे दराने डिझेल घ्यावे लागत आहे ही चक्क नागरीकांची लूट आहे असे ते म्हणाले.
गेल्या साडे सहा वर्षात मोदी सरकारने इंधन दरवाढीतून तब्बल 20 लाख कोटी रूपयांचा नफा कमावला आहे. हे 20 लाख कोटी गेले कुठे असा सवालही त्यांनी केला आहे.