नगर – जिल्ह्यात सध्या ऊस गाळप जोरात सुरू असून सर्व ऊसाचे गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरुच राहणार आहेत. जिल्ह्यात आजमितीस 1 कोटी 74 लाख 18 हजार 425 मेट्रीक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात शिल्लक उसाचा प्रश्नही उभा राहिला आहे. अजूनही जवळपास 9 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप बाकी आहे. जोपर्यंत कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक आहे तोपर्यंत कारखाने सुरू ठेवावेत अशा सूचना आहेत. त्यामुळे यंदा जूनपर्यंत कारखाने सुरू ठेवण्याची तयारी आहे.
जिल्ह्यात यंदा ऊसाचे उत्पादन जास्त झाले आहे. त्यामुळे अतिरिक्च उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस जास्त असला तरी कोणत्याही परिस्थितीत या ऊसाचे गाळप करणे आवश्यक आहे. त्यामुळे कारखान्यांनी त्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सध्या कारखान्यांची धावपळ सुरू आहे. याच काळात जिल्ह्यातील तीन ते चार कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे या कारखान्यांकडील हार्वेस्टर दुसऱ्या कारखान्यांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यासाठी साखर कार्यालयाने हार्वेस्टर वाहतूकदारांची यादीही मागवली आहे.ऊस गाळपात जिल्ह्यातील कारखान्यांनी आघाडी घेतली असली तरी अजूनही बराच ऊस शिल्लक राहिला आहे. सध्या मे महिना सुरू आहे. पुढील गाळप हंगामही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे हा शिल्लक ऊस गाळप करण्याचे आव्हान आहे.
श्रीरामपूर तालुक्यात 80 हजार मे. टन ऊस अतिरिक्त
अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्रीरामपूर तालुक्यात 80 हजार मेट्रीक टन ऊस शिल्लक असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे प्रवरानग, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी अतिरिक्त ऊसाचे गाळप करावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.