अनेक व्यक्ती क्षमता असूनही आपले ध्येय निवडण्यास एवढा विलंब करतात की, ते गाठण्यासाठी त्यांच्याकडे वेळच राहात नाही.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांचे आयुष्य, जीवनपट हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत. या मंडळींनी कमी वयात ध्येय निश्चित केले आणि यशाचे शिखर गाठले. अमिताभ बच्चन यांचा सुरुवातीचा काही काळ संघर्षात गेला, पण कालांतराने त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आयुष्यभर संघर्ष केला आणि हाती काहीच लागले नाही, असा काहींना अनुभव आला असेल किंवा पाहिलेही असेल. सर्वच सचिन आणि अमिताभ होऊ शकत नाही, हे देखील तितकेच खरे. कारण जेव्हा संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला नेमके करायचे काय आहे आणि कोठे जायचे आहे, हेच जर माहीत नसेल तर अशी स्थिती निर्माण होऊ शकते. कोणत्याही ध्येयाशिवाय वाटचाल करणे किंवा आपले ध्येय आणि काम अर्धवट स्थितीत सोडणे या गोष्टी आपल्याला कोठेच घेऊन जात नाहीत. परंतु वेळेवर लक्ष्य निश्चित करणे आणि त्याला मिळवण्यासाठी संघर्ष केल्यास आयुष्य प्रकाशमान होऊ शकते. वास्तविक प्रत्येक व्यक्तीसाठी कार्य निश्चित केलेले असते आणि ते काम करण्याची इच्छा आणि ऊर्जा त्याच्या अंगी असते. ही ऊर्जा समजून घेणारा आणि ओळखणारा कधीच मागे राहत नाही.
अनेक मुले म्हणतात की, मी इंजिनिअर होईल, डॉक्टर, आयएएस अधिकारी किंवा कलाकार किंवा क्रिकेटर होईल. परंतु ते ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी काम करत नाहीत. प्रसिद्ध अभिनेता लिओनार्दो डिकेप्रियो याने लहानपणीच अभिनेता होणार असल्याचे जाहीर केले होते. त्याने लहानपणीच ग्रेट क्लासिक मूव्ही पाहण्यासही सुरुवात केली होती. या इच्छेने त्याला ध्येय गाठता आले. म्हणजेच जी मंडळी ध्येय समोर ठेवून संघर्ष करतात, त्यांना अपयश येत नाही.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर हे एक आदर्श उदाहरण आले. त्यांच्यावर लहानपणीच संगीत, गीताचे संस्कार झाले. म्हणून त्यांनी संगीत क्षेत्रात इतिहास घडविला. दुसरीकडे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी तर एकदा आठवीच्या वर्गात सांगितले की, मी मोठा होऊन अमेरिकेचा अध्यक्ष होईन. ते केवळ बोलले नाही तर ते ध्येय गाठण्यासाठी मागे लागले. परिणामी वयाची पन्नाशी गाठण्याअगोदर ते जगातील सर्वात बलाढ्य देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले. यावरून लहानपणीच भविष्याचे गणित निश्चित करणारे मंडळी नेहमीच इतरांपेक्षा पुढे जातात हे लक्षात येते.
प्रसिद्ध खेळाडू रॉजर फेडरर सांगतो की, लहानपणी मी मजेखातर टेनिस खेळत होतो. माझे आई-वडील टेनिस क्लबचे सदस्य होते. त्यामुळे मला कमी वयातच टेनिस कोर्टवर जाण्याचे भाग्य लाभले. कालांतराने टेनिस खेळताना एवढा आनंद होऊ लागला की, वयाच्या चौदाव्या वर्षी नॅशनल फेडरेशन जॉइंन केले आणि प्रोफेशनल टेनिस खेळू लागलो.
हुशार मंडळी म्हणतात की, ज्यांना आपल्या आयुष्याचे ध्येय माहीत नसते त्या व्यक्ती जीवनभर काहीच करू शकत नाहीत. ज्या लोकांना यशस्वी व्हायचे असेल, त्यांना फार काळ लागत नाही. याउलट पात्र व्यक्ती आपले ध्येय निवडण्यास एवढा विलंब करतात की, त्यांना ध्येय गाठण्यासाठी वेळच राहात नाही. अर्थात पात्रता ही कर्माने निर्माण होते. जन्माने तर प्रत्येक व्यक्ती शून्य असते. त्यामुळे बहुतांश शाळेत प्राथमिकपासून ते उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, गणित विषयांबरोबरच खेळ, नृत्य, संगीत यासारख्या कलागुणांचा विकास करणाऱ्या अभ्यासक्रमांचा समावेश असतो. या आधारावर मुले आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करतील आणि वाटचाल करतील, असे गृहित धरले जाते.
साहजिकच आपल्या आवडीलाच ध्येय ठेवणे आणि त्याची व्यावसायिकरित्या निवड केल्यास यश निश्चितच मिळते. कारण ही गोष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हृदय, मेंदू आणि शक्ती पणाला लावत असतो. ध्येय निश्चित उशीर करण्याचा अर्थ म्हणजे मागे पडणे. लहान वयातच ध्येय निश्चित करणारा व्यक्ती नेहमीच इतरांपेक्षा पुढे जातो. नेल्सन मंडेला यांनी म्हटले की, जोपर्यंत आपण एखादे ध्येय साध्य करत नाही, तोपर्यंत ते ध्येय अशक्य वाटत राहते. तथ्यहिन गोष्टीत जास्त वेळ वाया घालावण्यापेक्षा ध्येयप्राप्तीचा विचार करणे गरजेचे आहे. ध्येयामागे धावताना वाटेत असे अनेकदा प्रसंग येऊ शकतात की, ते ध्येय अवघड वाटू शकते; परंतु त्याचवेळी आपण धिरोदत्तपणे उभे राहणे तितकेच गरजेचे आहे. या धाडसाने आणि संघर्षामुळे स्वत:मध्ये ऊर्जा निर्माण होईल. म्हणूनच आपल्या आवडीचे ध्येय निश्चित करायला हवे.
अमेरिकी इतिहासकार थिओडोर रुझवेल्ट यांच्या मते, स्वत:वर विश्वास ठेवाल तेव्हा आपण निम्मे ध्येय गाठलेले असेल. वास्तविक ध्येयाची निश्चिती ही व्यक्तीच्या मनातच होते. हा एक आवाज असतो आणि तो आपल्याला कोठे जायचे, हे सांगत असतो. संपूर्ण यश हे ध्येयनिश्चितीवरच अवलंबून आहे. जी व्यक्ती ध्येयाजवळ जाते, ती प्राप्त देखील करू शकते. परंतु योग्य वयात योग्य ध्येय मिळवणे ही सोपी बाब नाही. अन्यथा सर्वांनाच आकाश ठेंगणे झाले असते. वयाच्या आठव्या वर्षी मायकल फ्लेप्सने जलतरणमध्ये ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचे ध्येय साध्य केले.
कालांतराने त्याने 23 सुवर्णपदकासह एकूण 28 पदक जिंकून ऑलिम्पिक विक्रम प्रस्थापित केला. म्हणून गर्दीसमवेत जाण्याऐवजी स्वत:चा वेगळा मार्ग निवडा. कारण आपण स्वत:ला चांगले ओळखू शकतो, अन्य कोणीही नाही. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आवडीचे काम करा. प्रसिद्ध फ्रेंच विचारवंत अल्बैर कामू याने म्हटले की, माझ्या मागे येऊ नका, कदाचित मी नेतृत्व करू शकणार नाही. माझ्या पुढेही चालू नका, कदाचित मी पाठलाग करण्यास अपयशी ठरेल. हीच गोष्ट स्वत:ला लागू केल्यास प्रत्येक व्यक्ती वेगळा विचार करेल आणि काम करू शकेल.
कमलेश गिरी