गेल्या काही महिन्यांमध्ये मेटाव्हर्सचा खूप बोलबाला झाला. फेसबुक या क्षेत्रात येणार म्हटल्यावर बराच ऊहापोह सुरू आहे. मात्र, या सगळ्याला केवळ गेमिंग आणि सोशल मीडिया एवढाच संदर्भ नाही. आपण खऱ्या आयुष्यात जे जे करू शकतो, ते ते मेटाव्हर्समध्ये करता येईल. आपलंच एक रूप किंवा अवतार आपल्यातर्फे तिथे वावरेल. त्यामुळे जणू काही आपणच तिथे प्रत्यक्ष असल्याचा अनुभव मिळेल.
याला इमर्सिव्ह अनुभव म्हणतात. आज काही म्युझियम्स किंवा प्रसिद्ध स्थळांसाठी असे अनुभव ऑनलाइन घेता येतात. पण मर्यादित स्वरूपात. तिथे आपल्या अवताराला मुक्तपणे वागण्याची मुभा नसते. एखाद्या शिल्पाला हात लावून पाहण्याची संधी नसते. मध्ये थोडा वेळ बसलो किंवा इतर पर्यटकांशी बोललो, असे अनुभव घेता येत नाहीत. गेमिंगमध्ये थोडं जास्त स्वातंत्र्य असलं तरी दिलेल्या काही पर्यायांपलीकडे आपण निवड करू शकत नाही.
मेटाव्हर्समध्ये मात्र वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये प्रत्यक्ष फिरण्याचा आनंद घेता येईल. तिथल्या लोकांना भेटता येईल. तिथल्या पदार्थांचा व्हर्च्युअल स्वाद घेता येईल. ऑफिसला जाऊन सहकाऱ्यांशी चर्चा करायला मिळेल. कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंना स्पर्श करून, चोहोबाजूंनी निरखायला मिळेल. जगात कुठेही असलेल्या जिवलगांना भेटता येईल. थोडक्यात म्हणजे आज आपण रिमोट पद्धतीने काम, शाळा, संवाद करतो, तेच आणखी खरंखुरं वाटेल अशा प्रकारे करू शकतो. करोना काळात ऑनलाइन शाळा झाल्या. पण एकमेकांशी मस्ती करण्यासारखे अनुभव त्यात विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. तेच जर मेटाव्हर्समध्ये शाळा असेल तर एकत्र बसून डबा खाण्याचा आनंद सुद्धा घेता येईल.
ही झाली मेटाव्हर्सची सकारात्मक बाजू. पण असा अनुभव देण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आपल्याकडे आहे का? आपल्या पुढच्या प्रदूषण, पाणी, आरोग्य अशा गंभीर समस्यांवर काम करण्याऐवजी मेटाव्हर्सवर तांत्रिक क्षमता खर्च करणं योग्य आहे का? असे वाजवी प्रश्न उभे राहात आहेत. इतका भव्य इमर्सिव्ह अनुभव निर्माण करताना किती प्रचंड प्रमाणात ऊर्जा खर्च होईल याचाही विचार करावा लागेल.
ऊर्जानिर्मिती म्हटली की, प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढणार. तितकी आपल्याला मेटाव्हर्सची खरोखरीच गरज आहे का, हे पारखून घ्यावं लागेल. आज अनेक क्षेत्रं खासगी उद्योजकांकडे जात आहेत. त्यात नफ्याकडे लक्ष असल्याने पर्यावरणविषयक आणि सामाजिक परिणामांचा विचार होतोच असं नाही. तरुणाई यात गुंतून पडली तर इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होईल याकडेही समाजशास्त्रज्ञ लक्ष वेधत आहेत.
काही तज्ज्ञांच्या मते, मेटाव्हर्सचा उपयोग कसा करून घ्यायचा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. ऑनलाइन जगासारखे मेटाव्हर्सचेही फायदे-तोटे असतील. प्रवास कमी करून प्रदूषण आणि कामाच्या जागीचे धोके टाळता येतील. नवे उद्योग आणि नव्या उपक्रमांना चालना मिळेल. अर्थात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय पूर्ण निष्कर्ष काढता येणार नाही.
डॉ. मेघश्री दळवी