मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत बोलायचे तर विराट कोहलीसमोर अद्याप खूप मोठी कारकीर्द आहे. त्याने आपीएलला महत्त्व देण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबतच जास्त गंभीर राहिले पाहिजे, असे मत भारतीय संघाचे माजी कसोटीपटू व माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या दोनपेक्षा जास्त वर्षांपासून कोहली अत्यंत अपयशी कालखंडातून जात आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तर त्याची कामगिरी अत्यंत सुमार होत आहे. त्याने आता आयपीएलमधून ब्रेक घेण्याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. आयपीएल पुढील किंवा त्यानंतरच्या वर्षीही खेळता येईल. त्याने आता नेटमध्ये जास्त वेळ दिला पाहिजे. तसेच त्याच्या खेळात होत असलेल्या चुकांच्याबाबतही त्याने त्याच्याच पूर्वीच्या खेळींचे रेकॉर्डिंग पाहिले तर त्याला पुन्हा एकदा आत्मविश्वास गवसेल, असेही शास्त्री म्हणाले.
कोहलीने काही काळ ब्रेक घेतला तर तो ताजातवाना होईल. विश्रांतीच्या काळात त्याला त्याच्या खेळातील चुकांची जाणीवही होईल. मोठा खेळाडू जेव्हा विश्रांती घेत असतो तेव्हा त्याला त्याच्याच चुकांचा शोध लागतो. मी असे अनेक फलंदाज पाहिले आहेत की, ज्यांनी काही वेळा विश्रांती घेत थाटात पुनरागमन केले आहे. कोहलीसाठी एक ब्रेक खूप महत्त्वाचा आहे. तो सातत्याने क्रिकेट खेळत आहे. त्याने क्रिकेटच्या तीनही प्रकारात बराच काळ भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. आता त्याला स्वतःसाठी वेळ द्यायला हवा, तरच तो गमावलेला आत्मविश्वास परत मिळवेल, असेही त्यांनी सांगितले.
कारकिर्दीचा विचार करावा
कोहलीने आता आयपीएल स्पर्धेपेक्षा आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला पाहिजे. कोहलीची आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर तो आयपीएलमध्ये जास्त रमताना दिसत नाही, त्यामुळे त्याने या स्पर्धेतून ब्रेक घेतला तरी काही फरक पडणार नाही; पण त्याचा लाभ त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट केळताना निश्चितच होणार आहे. कोणताही खेळाडू सातत्याने सामने खेळत असेल व सातत्याने अपयशाचा सामना करत असेल तर त्याने काकीर्द लांबवण्यासाठी काही काळ ब्रेक घेणे गरजेचे असते, असेही मत शास्त्री यांनी नोंदवले आहे.