पिंपरी – राज्य शासनाचा प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या गटात पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे भाजपाच्या सत्ताकाळात विकासकामे झाली नाही, लोकाभिमुख कारभार झाला नाही, असे आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडी सत्तेत असलेल्या राज्य सरकारनेच” आरसा’ दाखवला आहे, अशी टीका भाजपाचे माजी सत्तारुढ पक्षेनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या गटात पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला आहे. कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व कार्यपद्धतीचा अंगीकार, ई- गव्हर्नन्स, लोकाभिमुख कार्यालय या उपक्रमात पालिका अव्वल ठरली आहे. ही बाब पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या दृष्टीने अभिमानाची आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने अनेक वर्षे सत्ता भोगली. मात्र, लोकाभिमुख कामे झाली नाहीत.
त्यामुळे शहरातील नागरिकांनी 2017 मध्ये सत्ता परिवर्तन घडवले. भारतीय जनता पार्टीच्या हातात शहराचा कारभार दिल्यानंतर प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरीता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्वांतत्र्य तर दिलेच, त्याशिवाय सकारात्मक निर्णयही घेतले. नागरिकांना ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळेच महापालिकेचे कामकाज राज्यात अव्वल ठरले आहे. नागरिकांचा सहभाग व योगदान यामुळेच हे शक्य झाले आहे, असेही ढाके यांनी म्हटले आहे.
आरोप करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे
भाजपाच्या काळातील विकासकामे ही राज्यात लक्षवेधी आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपावर टीका करीत आहेत. राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रमुख पक्ष असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रथम क्रमांक आला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी नागरिकांची दिशाभूल करण्याऐवजी आपण सत्तेत असताना काय चुका केल्या? याचे आत्मचिंतन करावे, असा सल्लाही ढाके यांनी दिला.