मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दोन मोठ्या घोषणा केल्या. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असून ५ जून रोजी सहाकाऱ्यांसमवेत अयोध्येला जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. “कुणाला बाळासाहेबांची कॉपी करायचीय, आणि जर कोणी कोणच्या स्पॉन्सरशिपने राजकारण करत असेल, तर त्यांना करु द्या,अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसामाध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी बोलताना राऊत यांनी,”अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. याबाबतचे प्रश्नच चुकीचे आहेत. कारण शिवसेना नेहमीच अयोध्या दौऱ्यावर जाते. तसेच, आमचं आणि अयोध्येचं नातं हे राजकीय नाही, निवडणुकीचं नाही, तसेच हे कोणत्याही षडयंत्रांचं भाग नाही. जेव्हापासून अयोध्येचं आंदोलन सुरु झाले आहे. तेव्हापासूनच शिवसेना आणि अयोध्येमध्ये एक नातं आहे. भावनिक नातं आहे. श्रद्धेचं नातं आहे. हे नातं तसंच असेल. जेव्हा सरकार नव्हतं तेव्हाही आम्ही जातचं होतो. आंदोलनाचा एक भाग होतो. महाराष्ट्रात सरकार आल्यानंतरही मुख्यमंत्री दोनवेळा अयोध्या दौऱ्यावर जाऊन आले आहेत. यंदा कोरोनामुळे आम्ही जाऊ शकलो नाहीत. त्यामुळे प्रभू श्री रामाचं दर्शन घेणं आमचं कर्तव्य आहे. तिथे आणखी काही कामं शिल्लक आहेत. खासकरुन भक्त निवासाचं काम आहे.”
“अयोध्येत प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद नेहमीच शिवसेनेला मिळाला आहे. कारण आमचं मन स्वच्छ आहे. आम्ही जे काही करतो, ते राजकीय फायद्यासाठी नाही करत आम्ही श्रद्धा असल्यामुळे करतो. कोणीही अयोध्या दौऱ्यावर जावं. प्रभू श्रीरामाच्या चरणावर कोणाला जायचं असेल, मोकळ्या मनानं, स्वच्छ मनानं तर जावं. जर तुम्ही राजकीय हेतूनं गेलात, तर मात्र श्रीराम मदत करणार नाहीत.”, असे राऊत म्हणाले.
औरंगाबादला राज ठाकरेंच्या होणाऱ्या सभेबाबत बोलताना संजय राऊत यांनी,”सरकारला कोणतंही आव्हान नाही किंवा शिवसेनेलाही नाही. मराठीवाड्यातील जनता खासकरुन औरंगाबादमधील जनता नेहमीच शिवसेनेला पाठिंबा देत आली आहे. खासकरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपला नेता मानलं आहे. जर कोणालाही तिथे सभा घ्यायची असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. देशात लोकशाही आहे. त्यामुळे देशात कोणीही कुठेही जाऊन सभा घेऊ शकतो. कोणी जर बाळासाहेबांची कॉपी करत असेल, तर तुम्ही काय करु शकता. उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यात अनेक सभा घेतल्यात. आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे. त्यासाठी आम्हाला कोणताही दिखावा करावा लागत नाही. जर कोणी कोणच्या स्पॉन्सरशिपनं राजकारण करत असेल, तर करु द्या. शिवसेना आपल्या ताकदीवर देशात आणि महाराष्ट्रात राजकारणात सक्रिय आहे आणि करत राहील.”