भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दीनेश कार्तिक याने आपल्यात अद्याप दोन ते तीन वर्षांचे क्रिकेट बाकी आहे हे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सिद्ध केले आहे. प्रश्न हा निर्माण झाला आहे ही बेभरवशाच्या ऋषभ पंतच्या जागी पर्याय म्हणून येत्या काळात कार्तिकला भारतीय संघात पुनारागमन करण्याची संधी मिळणार का.
या गुणी खेळाडूने तब्बल 18 वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, जसा महेंद्रसिंह धोनीचा भारतीय क्रिकेटच्या क्षितीजावर उदय झाला तसे कार्तिकला संधी मिळण्याचे प्रमाण खूपच खालावले. अर्थात त्यात वावगे काहीच नव्हते कारण धोनीने जे यश मिळवले व भारतीय संघाला मिळवून दिले त्याची तुलना होऊच शकत नाही. पण मग प्रश्न हा निर्माण होतो की जर कार्तिककडेही फिनिशर म्हणूनच पाहिले जात होते तर ऋषभ पंतवर इतकी मर्जी का व कोणाची.
त्याने ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला यश मिळवून दिले हे मान्य आहे पण एकदाही त्याने जबाबदारीने फलंदाजी केलेली नाही. चेंडूंची चुकीची निवड, अनावश्यक आक्रमकता व बेजबाबदार फटकेबाजीमुळे त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. अशा वेळी त्याला कार्तिक हाच सर्वोत्तम पर्याय आहे हे माहित असूनही इतकी वर्षे निवड समितीने सातत्याने का डावलले.
2018 साली निदाहास करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. तसेच 2019 साली बांगलादेशविरुद्ध पराभव दिसत असतानाही केवळ 8 चेंडूत 29 धावा केल्या होत्या आणि भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. आता धोनीच्या निवृत्तीनंतर व पंतच्या बेजबाबदारपणा सातत्याने पाहिल्यावरही जर कार्तिकचा विचार केला जाणार नसेल तर भारतीय क्रिकेटसाठी ही शोकांतिकाच ठरेल.
आता सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगळुरुकडून खेळताना त्याने 23 चेंडूत केलेली 44 धावांची सामना जिंकून देणारी खेळी जरी भारतीय संघाच्या निवड समितीने पाहिली असेल व कार्तिकला या स्पर्धेत आणखी सातत्याने यश मिळेल तर त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळालीच पाहीजे.