मुंबई – केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्याची भूमिका मोदी सरकारच्या काळात घेतली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी मोदी सरकारवर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत महेश तपासे बोलत होते.
यावेळी प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते महेश चव्हाण, माजी आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रीय महिला कार्यकारणी सदस्या डॉ. आशा मिरगे उपस्थित होत्या.
केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा विरोध प्रथम खासदार शरद पवार यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे, असा दावा तपासे यांनी केला. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या माहितीनुसार 4700 केसेसमध्ये ईडीची चौकशी सुरु आहे. पीएमएलएचा कायदा अंमलात आल्यापासून 313 लोकांना अटक करण्यात आली, 1700 ठिकाणी रेड टाकण्यात आल्या आहेत, अशी माहिती तपासे यांनी दिली. परंतु यामध्ये गुन्हा सिद्ध झालेला आकडा फार कमी आहे. ज्या लोकांनी देशात आर्थिक गुन्हे केले आहेत त्यांचा गुन्हा जर सिद्ध करायचा असेल तर केंद्रीय यंत्रणेचा वापर हा राजकीय भावनेतून न करता योग्य उद्दिष्ट ठेवून व्हायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजप पक्षाचे नेते सहजरीत्या आरोप करतात, त्यामध्ये पुढील काळात कोणावर धाड पडणार, कारवाई होणार अशी खात्रीलायक माहिती ते मांडतात. अशी सर्व माहिती भाजप नेत्यांना कशी मिळते हा प्रश्न तपासे यांनी उपस्थित केला.
देशातील वाढत्या महागाईवर बोलताना ते म्हणाले की, मागील 10 दिवसात 9 वेळा इंधन दरवाढ झाली आहे. तसेच देशातील गोरगरीब जनतेसाठी उज्ज्वला गॅस योजना सुरु करण्यात आली होती त्या योजनेचे काय झाले हा प्रश्न आता सामान्य जनता विचारत आहे. त्यामुळे मोदी सरकार आता अच्छे दिन आणण्याचे दिलेले वचन पूर्णपणे विसरले आहे, असा टोला महेश तपासे यांनी लगावला.
देशात जातीवादाच्या विचारसरणीला खतपाणी घालण्याचे काम होत आहे. यावर बोलताना महेश तपासे म्हणाले की, कर्नाटक राज्यात मंदिरांच्याबाहेर हिंदूंव्यतिरिक्त कोणत्याही धर्माच्या व्यक्तींनी स्टॉल लावू नयेत असा फतवा तिथल्या संस्थांनी काढला आहे. परंतु भारतीय संविधानाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे असे फतवे काढणे हे भारताच्या एकात्मतेसाठी चांगले नाही. ज्या संस्था असे फतवे काढत असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून शासन झाले पाहीजे, अशी मागणी तपासे यांनी केली.