कोरेगावकरांसह भीमाकाठच्या गावांचे आरोग्य धोक्यात
शेरखान शेख
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीमध्ये इंद्रायणी नदीचे दुषित पाणी सर्रास मिसळत आहे. तसेच सध्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली आहे. त्यामुळे भीमा नदीचे पाणी दूषित होऊन पाण्याला दुर्गंधी येत आहे. काळसर रंग आलेला आहे. पाणी शुद्धीकरण करुनही पाणी काळेच दिसून येत आहे. त्यामुळे जल शुद्धीकरण करुनही कोरेगाव भीमा तसेच नदीकाठच्या गावांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने पाण्याचे आवर्तन सोडण्याची वेळ निश्चित नसल्याचे कारण दिल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे.
भीमा नदी पात्रामध्ये इंद्रायणी नदीचे दूषित पाणी व त्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली आहे. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे. या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करवा लागत आहे. तसेच येथील नदीच्या आणि आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्यावर वेगळा कोणतातरी तवंग पाण्यावर दिसून येत आहे. या नदीपात्रातील दुषित पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर भीमा नदीपात्रा लगतच कोरेगाव भीमा गावाला पाणीपुरवठा करणारी नळपाणी पुरवठ्याची विहीर आहे.
या विहिरीमध्ये नदीपात्रातील पाणी उतल्याने विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. तसेच हे पाणी जलशुद्धीकरण यंत्रातूनही शुद्ध होत नसल्याने नागरिकांना दूषितच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या पाण्याने आंघोळ केल्यामुळे नागरिकांना त्वचेच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता नदीपात्रात इंद्रायणी नदीतील दुषित पाणी भीमा नदीत मिसळल्याने पाणी दुषित झाले आहे. हे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पातही शुद्ध होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कारभारावर रोष व्यक्त केला आहे. मात्र भीमा नदीतच इंद्रायणीचे दुषित पाणी मिसळत असल्याने व पाटबंधारे विभागाचे अधिकारी याबाबत कोणतीच दाद देत नसल्याचे ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले यांनी सांगितले.
भीमा नदीचे दूषित पाणी सोडून देत नवीन आर्वतन सोडण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. त्यामुळे वरिष्ठांशी संपर्क साधत मार्ग काढण्यात येईल.
– श्रीकृष्ण गुंजाळ, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग