मुंबई – गुजरातमध्ये कौटुंबीक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले होते. हा आरोपी गुजरातमधील बडोदा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. कारागृहातून तो फरार झाला होता. त्यानंतर गुजरात पोलीस या आरोपीचा गेल्या 23 वर्षापासून शोध घेत होते. हा कैदी नाव बदलून महाराष्ट्रात नोकरी करत असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांना मिळाली, त्यावरून गुन्हे शाखेने तत्काळ छापा टाकून त्याला अटक केली. जे काम गुजरात पोलिसांना 23 वर्षापासून जमने नाही ते महाराष्ट्र पोलिसांनी करून दाखवले आहे.
कारागृहातून फरार झालेल्या एका कैद्याला तब्बल 23 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या उल्हासनगर गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, रमेश तायडे नावाच्या व्यक्तीने 1995 मध्ये गुजरातमधील सुरत येथे पत्नीला जिवंत जाळले. या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
पत्नीच्या हत्येप्रकरणी रमेश बडोदा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. या दरम्यान 1999 मध्ये तो पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला, मात्र तेव्हापासून तो फरार झाला होता. जवळपास 23 वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, रमेश हा महाराष्ट्रातील उल्हासनगर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेने घटनास्थळी छापा टाकून त्याला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.