लखनौ – उत्तरप्रदेशच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उद्या सोमवारी मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह 54 जागांचा समावेश या अखेरच्या टप्प्यातील मतदानामध्ये आहे. त्यासाठी 613 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
आजमगढ, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, भदोही आणि सोनभद्र जिल्ह्यातील हे मतदार संघ आहेत. या टप्प्यातील 54 जागांपैकी 11 मतदार संघ अनुसूचित जाती आणि दोन अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. उद्याच्या मतदानासाठी 2 कोटी 6 लाख मतदार मतदानासाठी पात्र आहेत.या टप्प्यातील प्रचाराची मुदत काल सायंकाळी संपली.
गेल्या 10 फेब्रुवारी पासून या राज्यात टप्प्याटप्प्याने ही मतदान प्रक्रिया राबवली गेली. 10 मार्च रोजी उत्तरप्रदेशसह अन्य चार राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. या निवडणूक प्रचारात अनेक मुद्दे विविध पक्षांकडून मांडले गेले. त्यात कोविड महामारी, कायदा आणि सुव्यवस्था, आर्थिक डबघाई, महिला सुरक्षितता आदि विषयांपासून ते शेतकरी आंदोलनापर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर भाजप आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी पक्षांनी एकमेकांवर हल्ले केले.
शेवटच्या टप्प्यातील लढाईत उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री नीळकंठ तिवारी (दक्षिण वाराणसी), अनिल राजभर (शिवपूर-वाराणसी), रवींद्र जैस्वाल (वाराणसी उत्तर), गिरीश यादव (जौनपूर) आणि रमाशंकर सिंग पटेल (मरिहान-मिर्झापूर) हे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.