एसबीएसपी पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांचा आरोप
मुबारकपूर – गृहमंत्री अमित शहा यांच्या दालनात बहुजन समाज पक्षाचे उमेदवार निश्चित केली जातात असा आरोप सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे. भाजपला मदत करण्याच्या उद्देशानेच बसप उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे बसपाला मतदान करताना लोकांनी सावध राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
निवडणुकीनंतर आपला पक्ष भाजपशी पुन्हा हातमिळवणी करेल असा दावा काही जणांनी केला आहे त्यावर भाष्य करताना राजभर म्हणाले की, हा खोटा प्रचारही भाजपच्याच लोकांकडून केला जात आहे.
भाजपच्या लोकांना नागपुरात खोटे बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते, असा आरोपही त्यांनी केला. राजभर यांच्या पक्षाने गेली निवडणूक भाजपशी युती करून लढवली होती. पण आता हा पक्ष समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करून भाजपचा सामना करीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षावर दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे, त्यावर भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्याशी आघाडी केलेली चालते पण परंतु सपाने मुस्लिमांच्या हक्कांबद्दल बोललेले भाजपला चालत नाही. हा दुटप्पीपणा आहे, असे ते म्हणाले.