हिमांशू
मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे. मतदानापूर्वी आणि नंतर कितीही अपवित्र गोष्टी घडल्या तरी मतदानाचा दिवस एखाद्या सणासारखा वाटतो. लोक शूचिर्भूत होऊन भल्या सकाळी मतदान केंद्रावर जाऊन रांगा लावून उभे राहतात. मग निवडणूक लोकसभेची असो वा नगरपालिकेची. मतदानाच्या त्या एका दिवसासाठी उमेदवार जीवाचं रान करतात. गर्दी जमा करतात किंवा जिथे नेहमीच गर्दी असते अशी ठिकाणं शोधत फिरतात. ठाणे, मुंबई, नवी मुंबई अशा महानगरी पट्ट्यात सकाळी आणि संध्याकाळी लोकलला प्रचंड गर्दी असते. अशा वेळी तिथले उमेदवार रेल्वे स्थानकावर किंवा लोकलगाडीत हमखास भेटतात. त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते हॅंडबिलं वाटत असतात. हेच कार्यकर्ते उमेदवाराला गर्दी हटवून रस्ताही करून देत असतात. बऱ्याच वेळा कार्यकर्ते आधीच्या स्टेशनावर लोकलगाडीत चढतात आणि उमेदवारासाठी जागा धरून ठेवतात. मग त्या जागेवर बसून उमेदवार प्रवाशांशी संवाद साधतो.
खरंतर महानगरी नागरिकांसाठी लोकल प्रवासाची वेळ म्हणजे “वैतागवेळ’! पण साक्षात उमेदवार आपल्याला भेटायला आल्याच्या आनंदात ते वैतागही विसरतात. काही उमेदवार वाहनांना आपल्या निवडणूक चिन्हाचा आकार देऊन प्रचाररथ तयार करतात, एलईडी स्क्रीनवरून केलेल्या कामांची डॉक्युमेंटरी दाखवतात, बल्क एसएमएस आणि फोनच्या माध्यमातून प्रचार करतात, गर्दीच्या वेळी देवळांमध्ये जाऊन दर्शन घेतात, नेहमी गर्दी असलेल्या ठिकाणी बॅनर लावतात, पदयात्रा वगैरे काढतात!
हे सगळं ज्या (एक दिवसाच्या) मतदारराजासाठी, तो आपल्याबद्दल काय विचार करीत आहे, याचा अंदाज मात्र उमेदवारांना लवकर येत नाही. त्यातल्या त्यात मागील पाच वर्षे सत्तेवर असलेल्या उमेदवाराला तर अधिक धाकधूक असते. लोकांना आपलं काम पसंत पडलंय का? लोक पुन्हा संधी देतील का? आपलं काही चुकलं तर नाही ना? असे असंख्य प्रश्न अशा उमेदवारांच्या मनात असतात. उत्तर प्रदेशात उमेदवाराच्या मनातील ही धाकधूक प्रचाराच्या मंचावरच बाहेर पडली.
भाजपचे उमेदवार भूपेश चौबे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत खुद्द उमेदवाराने मतदारांसमोर जे काही केलं, ते पाहून मतदारराजाही गोंधळून गेला. निवडून आल्यावर पाच वर्षे नेतेमंडळींचा काय रुबाब असतो, हे वेगळं सांगायची गरज नाही; पण निवडणूक सगळ्यांना गुडघ्यावर आणते हेच खरं. गेल्या पाच वर्षांत आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, तर मतदारांनी त्या माफ कराव्यात, अशी विनंती करून भूपेश चौबे चक्क त्यांच्या खुर्चीवर उभे राहिले. स्वतःचे कान पकडले आणि खुर्चीवरच त्यांनी उठाबशा काढायला सुरुवात केली. सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्टसगंज हा त्यांचा मतदारसंघ. त्यांच्या प्रचाराला खास झारखंडहून माजी आरोग्यमंत्री भानूप्रताप शाही उपस्थित होते, तेही या प्रकारामुळे गोंधळात पडले.
उठाबशा काढून झाल्यावर भूपेश चौबे यांनी कान सोडून हात जोडले आणि “”गेल्या पाच वर्षांत माझ्याकडून जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही,” असं म्हणून जनता जनार्दनाची माफी मागितली. गेल्या पाच वर्षांत चौबे यांनी विकासकामं केली नसल्यानं त्यांच्याबद्दल समाजात रोष आहे, असं सांगितलं जातंय. थोडक्यात, आपल्यासारख्यांनी पाच वर्षांत कामं होणार नाहीत, याचीही तयारी ठेवायची आणि निवडणूक काळात असलं काहीतरी विचित्र पाहायचीही तयारी ठेवायची!