आम आदमी पक्षाला जर पंजाबात सरकार स्थापन करायचे असेल तर त्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळणे आवश्यक आहे. त्याहून कमी जागा मिळाल्या तर या पक्षाला सरकार स्थापन करण्यात अडचणी येतील. कारण या पक्षाला सर्वच पक्ष आपल्यासाठी धोकादायक असल्याचे मानतात.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यावेळी पंजाबमधील सामना सर्वांत रंगतदार आणि तितकाच संभ्रम निर्माण करणारा आहे. परिस्थिती इतकी विचित्र बनली आहे, की ऐनवेळी, शेवटच्या टप्प्यात चित्र बदलू शकते. ज्याचे भाग्य चमकताना दिसत आहे, ते अचानक अखेरच्या टप्प्यात काळवंडू शकते आणि ज्याचे नशीब साथ देणार नाही असे वाटते त्याचे भाग्य उजळू शकते. पंजाबमधील जे राजकीय वातावरण सध्या आहे, त्याची सुरुवात कॅप्टन अमरिंदरसिंह विरुद्ध नवज्योतसिंह सिद्धू यांच्या भांडणापासून होते.
गंमत म्हणजे सध्या हे दोघेही चर्चेतून बाहेर फेकले गेले आहेत. या दोघांचे भांडण जेव्हा शिगेला पोहोचले तेव्हा कॅप्टन अमरिंदरसिंह यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. आता डाव सिद्धू यांच्या हाती आला असे त्यावेळी वाटू लागले होते. परंतु अवघ्या आठवडाभरात सिद्धूही चर्चेतून बाहेर फेकले गेले. चरणजीतसिंह चन्नी अचानक प्रकाशात आले. आता मुख्यमंत्रिपदाचा कॉंग्रेसचा चेहराही चरणजीतसिंह चन्नी आहे.
पंजाबात सर्वांत रहस्यमय स्थिती आहे ती आम आदमी पक्षाची. गेल्या काही महिन्यांमधील राजकीय स्थिती पाहता येथील लढाई आम आदमी पक्ष विरुद्ध कॉंग्रेस अशी दिसत आहे. वास्तविक, तत्पूर्वी कॉंग्रेस एकतर्फी निवडणूक जिंकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु सिद्धूंनी ज्या प्रकारे आपल्याच पक्षावर प्रहार केले, त्यामुळे कॉंग्रेसचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. चरणजीतसिंह चन्नी हे कॉंग्रेससाठी मास्टरस्ट्रोक ठरू शकतात, परंतु त्यासाठी पक्षाने गांभीर्याने प्रवास करणे अपेक्षित होते. कॅप्टन अमरिंदरसिंह यांची लोकप्रियता आजही सिद्धू यांच्यापेक्षा चार ते पाचपट अधिक आहे.
मालवा येथे आम आदमी पक्ष आधीपासूनच मजबूत आहे. यावेळी दोआबामध्येही पक्षाची स्थिती मजबूत दिसत आहे. अर्थात, या पक्षाची मते अस्थिर असतात. शेतकरी आंदोलनालाही लोकांनी पूर्णपणे पाठिंबा दिला नाही. शेतकरी आंदोलनाशी संबंधित लोक स्वतः निवडणूक लढवीत आहेत. जर त्यांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाली तर कॉंग्रेसचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान एक ते दोन टक्क्यांपर्यंत असू शकते. चन्नी यांच्यामुळे दलित मतांचे ध्रुवीकरण झाले आहे. ही मते आम आदमी पक्षाच्या हातून निसटताना दिसत आहेत. दलित मतांमध्येही फूट स्पष्ट दिसत आहे. रामदसिया समाजाचे मतदार पूर्णपणे चन्नी यांच्यासोबत आहेत. त्याव्यतिरिक्त जी दलित मते आहेत त्यातील काही आम आदमी पक्षासोबत तर हिंदू दलित मतदार भाजपसोबत आहेत.
भाजप पंजाबात स्पर्धेत कुठेच नाही, असे मानले जात होते; परंतु आता हा पक्षही स्पर्धेत दिसत आहे. पंजाबच्या निवडणुकीत कॅप्टन अमरिंदरसिंह यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते. आज पंजाबातील तीनपैकी एका व्यक्तीला असे वाटते की, अमरिंदर आणि भाजप हे या निवडणुकीतील महत्त्वाचे घटक आहेत. भाजपचा जो निद्रिस्त मतदार होता, तो पाच वर्षांपूर्वी अकाली दलापासून विलग होऊ इच्छित होता. आता भाजप स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवीत असल्यामुळे हा निद्रिस्त मतदार जागृत झाला आहे. भाजप आणि अमरिंदर यांना गंभीरपणे घ्यायला हवे, असे अकाली दल आणि कॉंग्रेसलाही वाटू लागले आहे.
अकाली दलाला असे वाटण्याचे कारण असे की, 1996 नंतर प्रथमच भाजप स्वबळावर निवडणूक रिंगणात आहे. जी हिंदू मते भाजपमुळे अकाली दलाला मिळत होती, ती आता मिळू शकणार नाहीत असे अकाली दलाला वाटू लागले आहे. ही मते सुमारे पाच ते सात टक्के आहेत. ही मते विखुरलेली आहेत. ती एकत्र आणल्यास हा आकडा सात ते आठ टक्क्यांवर जाऊ शकतो. या संख्येकडे संपूर्ण राज्याच्या संदर्भात न पाहता पाच-सहा जिल्ह्यांच्या हिशोबाने पाहिल्यास हे मतदार 27 ते 37 टक्क्यांच्या आसपास परिणामकारक ठरू शकतात. उदाहरणार्थ, पठाणकोट, जालंधर, अमृतसर या जिल्ह्यांमध्ये ही मते भाजपच्या दिशेने जाताना दिसून येतात. त्याचप्रमाणे पटियाला आणि आसपासच्या भागात जिथे कॅप्टन अमरिंदरसिंह यांचा प्रभाव आहे, तिथे कॅप्टन मुसंडी मारू शकतील.
या जागांची बेरीज करता ती 50 पर्यंत जाते. यातील 25 जागांच्या बाबतीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांसाठी चढाओढ आहे. निकाल बदलण्याची किमया येथे घडू शकते. पंजाबच्या निवडणुकीत शेवटच्या दोन आठवड्यांत परिस्थिती बदलू शकते. कॅप्टन अमरिंदरसिंह चमत्कार घडवून आणू शकतात. अमरिंदर यांची गणिते चपखल बसलीच तर 10 ते 12 जागा त्यांना मिळू शकतात. अशा स्थितीत कॅप्टन हे किंगमेकरच्या भूमिकेत दिसतील. परंतु जर त्यांनी केवळ चार-पाच टक्केच मते घेण्यात यश मिळविले तर त्यांना केवळ कॉंग्रेसच्या पराभवाचे श्रेय घेता येईल.
कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहांचा फायदा कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्या बरोबरच अकाली दलालाही मिळू शकतो. जिथे कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षात प्रमुख लढत होईल असे मानले जात होते, त्यातील काही ठिकाणी आता अकाली दल विरुद्ध आम आदमी पक्ष अशी लढत रंगेल असा अंदाज वर्तविला जात आहे. सहा महिन्यांपूर्वी असे वाटत होते की अकाली दलाला 20 जागा तरी घेता येतील की नाही? परंतु आता ज्या गतीने पक्षाला पाठिंबा मिळत चालल्याचे दिसते ते आश्चर्यजनक वाटू शकते; मात्र तसे ते नाही.
या ठिकाणी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती अशी की, आम आदमी पक्षाला जर सरकार स्थापन करायचे असेल तर त्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळणे आवश्यक आहे. बहुमतापेक्षा चार-पाच जागा कमी मिळाल्या तर या पक्षाला सरकार स्थापन करण्यात अडचणी येतील. कारण आम आदमी पक्षाला सर्वच पक्ष आपल्यासाठी धोकादायक असल्याचे मानतात. दिल्लीत याचा अनुभव सर्व पक्षांनी घेतला आहे. जर आम आदमी पक्ष बहुमतापेक्षा कमी जागा जिंकू शकला, तर पंजाबात गोव्यासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
– व्ही. के. कौर