मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमावर करोनाचे सावट असल्यामुळे ही संपूर्ण स्पर्धा एकट्या मुंबईतच आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत बीसीसीआयने दिले आहेत. आधी सांगतल्या प्रमाणे ही स्पर्धा मुंबई व पुणे या दोन शहरांत होणार होती. मात्र, आता पुण्याचा पत्ता कट होणार असल्याचे संकेत मिळत असून केवळ मुंबई व नवी मुंबईतील मैदानांवरच ही संपूर्ण स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा पुढील काही दिवसांत केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.
यंदाच्या मोसमातील आयपीएलमधील सर्व सामने मुंबईतच आयोजित करण्यावर बीसीसीआयच्या बैठकीत सहमती झाली आहे. मुंबईत स्टेडियमची संख्या जास्त आहेत तसेच अन्य अत्यावश्यक सुविधांचा विचार करता ही स्पर्धा येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वी आयपीएलचे आयोजन भारतातच होणार असल्याचे म्हटले होते. आयपीएलचा यंदाचा 15 वा मोसम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असल्याचे सांगितले जात असून मे महिन्याच्या अखेर ही स्पर्धा संपूष्टात येइल.
आयपीएलसाठी मुंबईतील वानखेडे, ब्रेबोर्न आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील अशी 3 स्टेडियम आहेत. यामुळे खेळाडूंना विमानाने प्रवास करण्याची गरज पडणार नाही. यामुळे करोनाचा धोका कमी होईल. तसेच मुंबईत फाईव्ह स्टार हॉटेलची संख्या देखील जास्त आहे. यामुळे खेळाडूंना राहण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तीथेच बायोबबलची निर्मिती सहजपणे केली जाऊ शकते.
चुका टाळण्यासाठीच अट्टहास
बीसीसीआयला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात झालेल्या चुका टाळायच्या आहेत, त्यामुळेच स्पर्धेसाठी एकच शहर निवडले जाणार आहे. गेल्या वर्षी आयपीएलचे आयोजन भारतातील 6 ठिकाणी करण्यात आले होते. तेव्हा अहमदाबाद, बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांची निवड करण्यात आली होती. पण खेळाडूंना करोना झाल्याने ही स्पर्धा मध्येच स्थगित करावी लागली आणि दुसरा टप्पा सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अमिरातीत आयोजित करावा लागला.