लखनऊ – उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा देऊन अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. मौर्य यांनी विश्वास व्यक्त केला की, ते निवडणुकीपूर्वी विजयी होणाऱ्या पक्षात सहभागी होतात. ते ज्या पक्षात असतात त्याच पक्षाची सत्ता येते. 2017 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी मौर्य 2016 मध्ये मायावतींचा बहुजन समाज पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले. आता ते राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षात प्रवेश करत आहेत.
निवडणुकीपूर्वी मौर्य पक्ष का बदलतात?
स्वामी प्रसाद मौर्य यांनी सांगितले की, ‘जोपर्यंत मी बसपात होतो तोपर्यंत यूपीमध्ये तो नंबर एकचा पक्ष होता. आता तो कुठेच नाही. मी जेव्हा भाजपमध्ये सहभागी झालो तेव्हा 14 वर्षांच्या वनवासानंतर भाजप सत्तेत आला आणि बहुमताचे सरकार स्थापन केले. मात्र भाजपने त्यांच्या सत्ता काळात लोकांच्या विरोधात काम केले. मी योग्य मंचांवर माझा असंतोष व्यक्त केला पण माझे ऐकले गेले नाही. परिणामी मला राजीनामा द्यावा लागला, असे मौर्य म्हणाले.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी ट्विटरवर राजीनामा पत्र पोस्ट केल्यानंतर लगेचच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांना या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. केशव मौर्य म्हणाले, ‘स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा का दिला हे मला माहीत नाही, पण मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी राजीनामा देऊ नये, आपण चर्चा करू. घाईघाईने घेतलेल्या निर्णयाचा विपरीत परिणाम होऊ शकतो.’