लखनौ – भारतीय जनता पक्षाचे उत्तरप्रदेशातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य तसेच भाजपच्या तीन विद्यमान आमदारांनी भाजपला धक्का दिला असून त्यांनी पक्षाचा राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
ऐन निवडणूक काळात भाजपला बसलेला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. आज ही घोषणा करताना मौर्य यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवरही सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की भाजप सरकारच्या काळात छोटे दुकानदार, शेतकरी आणि अन्य कमकुवत घटकांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
मौर्य यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अन्य तीन आमदार रोशनलाल वर्मा, ब्रजेश प्रजापती, आणि भगवती सागर यांनीही आपल्या आमदारकीचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मौर्य यांच्या बरोबर भाजपचे आणखीही काही मंत्री आणि आमदार येत्या काही दिवसांत भाजपची साथ सोडून समाजवादी पक्षात जाण्याची शक्यता आहे.
मौर्य यांनी आज पत्रकारांशी बोलताना तसे सूचित केले आहे. आपण भाजप सोडल्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या यशावर निश्चीतच विपरित परिणाम दिसून येईल असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांना घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये असे आवाहन केले असून त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा असे आवाहनही त्यांना केले आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे पुर्व उत्तरप्रदेशातील एक प्रभावशाली नेते मानले जातात.