नवी दिल्ली : ओमायक्रॉनसह मूळ करोना रुग्णांची संख्या देशात पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवली आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेला निर्णय प्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी ओमायक्रॉनच्या नियंत्रणाची जबाबदारी केंद्राने राज्यांवर सोपवली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मंदिरे पुन्हा बंदी केली जाण्याबद्दल भाष्य केले आहे. तुळजापुरमध्ये कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेल्या पवार यांनी देवीच्या दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना करोनाच्या नवीन नियमांच्या हवाल्याने हे वक्तव्य केले आहे.
“ओमायक्रॉन रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने घातलेले निर्बंध सर्व राज्यांना बंधनकारक आहेत. रुग्णसंखेचा विच्यार करून लॉकडाऊन करायचा की नाही हा आधिकार राज्य सरकारला आहे,” असा संदर्भ देत केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी पुन्हा एकदा करोना नियंत्रणासंदर्भातील कठोर निर्बंधांचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात असल्याचे संकेत दिले आहे.
“नियमाचे व केंद्राच्या निर्देशाचे पालन केल्यास अशी वेळ येणार नाही मात्र महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढल्यास मंदिरे पुन्हा बंद होऊ शकतात,” असेही भारती पवार यांनी तुळजापुर येथे मंदीर संस्थान सत्कार प्रसंगी म्हटले आहे.
पवार यांनी रविवारी सायंकाळी सहकुंटूब महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा मंदिर प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मंदिरं बंद करण्यासंदर्भातील विषयावर भाष्य केले.
केरळ, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विविध वृत्तवाहिन्यांची वृत्ते, राज्य सरकारांच्या अंतर्गत आढाव्यातील माहितीवरून करोना बाधितांची संख्या, मृतांचे प्रमाण आणि ओमायक्रॉन रुग्णसंख्या वाढत असल्याचे आढळले. या दहापैकी काही राज्यांमध्ये लसीकरणाचा वेगही सरासरी राष्ट्रीय वेगापेक्षा कमी असल्याचे आढळले. त्यामुळेच दहा राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.