पुणे – स्पोर्टसफील्ड मॅनेजमेंट आयोजित पहिल्या इंद्राणी बालन विंटर टी-20 लीग अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने सलग सातवा विजय नोंदवित स्पर्धेत आगेकूच केली. वैंकिज् इलेव्हन संघाने केवळ पाचव्या षटकात विजय मिळवून स्पर्धेत तिसरा विजय नोंदविला.
मुंढवा येथील लिजंडस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या गटसाखळी फेरीत अतिशय कमी धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात गौरव जोत्शी याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर वैंकिज् इलेव्हन संघाने कल्याण क्रिकेट क्लबचा 10 गडी राखून एकतर्फी पराभव केला. कल्याण क्रिकेट संघाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यांतर वैंकिज् इलेव्हन संघाच्या गौरव जोशी याने 11 धावात 4 गडी बाद करून कल्याण क्रिकेट संघाच्या डावाला खिंडार पाडले. यामुळे त्यांचा डाव 14.4 षटकात 58 धावांवर गडगडला.
वैंकिज् इलेव्हन संघाच्या अरविंद चौहान (2-8) यानेही दुसऱ्या बाजूने उत्तम साथ दिली. अमित सिंग (नाबाद 28 धावा) आणि आदित्य कदम (नाबाद 32 धावा) यांच्या फलंदाजीमुळे वैंकिज् इलेव्हनने 4.3 षटकामध्ये हे आव्हान पूर्ण केले. शिंदे याच्या 87 धावांच्या खेळीमुळे पुनित बालन ग्रुप संघाने आर्यन्स् क्रिकेट क्लबचा 66 धावांनी पराभव करून सलग सातवा विजय नोंदविला.
फलंदाजी करताना पुनित बालन संघाने 19 षटकात 6 गडी गमावून 187 धावांचे आव्हान उभे केले. धनराज शिंदे याने 87 धावा तर, ओंकार खाटपे याने 58 धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना आर्यन्स् क्रिकेट क्लबचा डाव 19 षटकामध्ये 121 धावांवर मर्यादित राहीला.