पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मतदाराच्या एका मतात सरकार बदलण्याची किंवा स्थापन करण्याची ताकद असते. अधिकाधिक मतदारांनी या ताकदीचा वापर करावा, यासाठी कंटेट क्रिएटर्सनी मतदानाबाबत जागृती करून देशाच्या विकासात भागीदार व्हावे, असे आवाहन पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केले.मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुनीत बालन ग्रुपतर्फे पुण्यात वन क्लिक वन वोट कॅन चेंज द वर्ल्ड क्रिएटर्स मिटचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासह कंटेट क्रिएटर उपस्थित होते. सध्या सोशल मिडियाची ताकद प्रचंड असून, तरुणांसह सर्वच वयोगटांतील नागरीक सोशल मीडियाचा एक भाग बनले आहेत. या ताकदीचा वापर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी करणे गरजेचे आहे. त्यासाठी कंटेट क्रिएटर्सनी सक्रिय योगदान देण्याची गरज असल्याचे मत बालन यांनी व्यक्त केले.
यावेळी मोहोळ म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांशी संवाद होतो. त्यांचे प्रश्न जाणून घेता येतात आणि त्यावर उपाययोजनाही करता येतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता म्हणून अधिक प्रभावी काम करता येते.
तरडे म्हणाले, की काही सेकंदाच्या कंटेंटमध्ये लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम अवघड असते. मात्र, कंटेट क्रिएटर्स आपल्या प्रतिभेतून हे काम सहज करू शकतात. असेच काम त्यांनी मतदान जागृतीसाठी केले, तर ते राष्ट्रीय कार्य होईल.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कंटेट क्रिएटर्सनी लोकांमध्ये सकारात्मकता पसरवणे गरजेचे आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने मतदानाबद्दल जनजागृती केली, तर मतदानाचे प्रमाण वाढेल. मतदारांनीही मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे म्हणून घरी न बसता मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, तरच त्यांना सरकारवर बोलण्याचा अधिकार राहील. – पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप