महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती
पुणे, दि. 19 – अवर्षण व अवेळी झालेल्या पावसाने ठिकठिकाणी जी दुष्काळी परिस्थिती उद्भवली त्याबद्दल महाराष्ट्र समाजवादी पक्षाने एका ठरावात चिंता व्यक्त केली आहे. बैठकीने केलेल्या ठरावात म्हटले की, रत्नागिरी, कुलाबा जिल्हा अतिवृष्टीने ओल्या दुष्काळाचे खाईत पडलेला आहे, तर मालेगाव-सटाणा, भंडारा-चंद्रपूर विभागात अवेळी झालेल्या पावसाने परिस्थिती बिघडली आहे. बाजरीवर रोगराई पसरल्याने धान्यटंचाई निर्माण झाली आहे.
सरपंचांना पोलीस पाटलांचे अधिकार?
नागपूर – पोलीस पाटलांचे अधिकार सरपंचांना देण्याबाबत राज्य शासन सध्या विचार करीत आहे, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री रमेश वळवी यांनी दिली. मात्र याबाबत निर्णय केव्हा घेतला जाईल हे आताच सांगता येणार नाही.
देशात सर्वाधिकरेडिओ सेट्स दिल्लीत
नवी दिल्ली – देशात सर्वात अधिक रेडिओ सेट्स दिल्लीत आहेत. आज याबाबत लोकसभेत माहिती देताना दळणवळण मंत्री डॉ. शंकर दयाळ शर्मा म्हणाले की, दिल्लीत 30 जुलै 1974 च्या नोंदणीप्रमाणे 7,92,066 रेडिओ परवाने काढलेले होते. इतर काही प्रमुख शहरातील आकडे असे- मुंबई-7,16,250, कलकत्ता-2,74,709 व मद्रास-2,09,800.
करचुकवेगिरीचा कळस
पुणे – देशामध्ये दरवर्षी 7 ते 8 हजार कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार लपविले जातात. त्यामुळे दीड ते दोन हजार कोटी रुपयांचा आयकर चुकविला जातो. गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये तर करचुकवेगिरीचा कळस झाला आहे, अशी माहिती आयकर खात्याचे पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त डी. जी. प्रधान यांनी आज दिली.