नवी दिल्ली – कोविडमुळे देशात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत मिळावी या मागणीसाठी कॉंग्रेसने ऑनलाइन मोहीम सुरू केली असून त्याचे उद्घाटन आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ज्यावेळी लोकांना झालेला त्रास आणि त्यांचे नुकसान याचा विषय येतो त्यावेळी भारत सरकार झोपी जाते. आता या झोपलेल्या सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेसने या मोहिमेच्या संबंधात म्हटले आहे की, देशात कोविडमुळे नेमके किती जण दगावले याची माहिती देशाला मिळाली पाहिजे आणि यातील प्रत्येक मृतांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.
मोदी सरकारने कोविड साथीत दगावलेल्यांची खरी आकडेवारी लपवली असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोविडवर नियंत्रण मिळवण्यात आपल्या सरकारला आलेले अपयश दडपण्याचाच भाजपचा हा प्रयत्न आहे, असा आरोपही कॉंग्रेसने केला आहे.