जळगाव – मागील काही काळापासून बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यातच हृदयाशी संबंधीत आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. जळगावच्या 24 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
येथील अश्विन भरतकुमार जांगडा (वय 24,) याचा औरंगाबादहून जळगावला घरी जाताना मध्यरात्री प्रवासातच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. अश्विन कुटुंबातील एकूलता एक मुलगा असून त्याच्या मृत्यूने जांगडा कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
औरंगाबादमध्ये असतानाच अश्विनला छाती दुखण्याचा त्रास होत होता. बुधवारी त्याने या संदर्भात आपल्या वडिलांशी चर्चा केली. त्यानंतर वडिलांनी त्याला उपचारासाठी जळगावला येण्यास सांगितलं. त्यानुसार काम आटोपून अश्विन रात्री जळगावला निघाला होता.
दरम्यान मध्यरात्री प्रवासात सिल्लोडपासून काही अंतरावर असताना अश्विनच्या छातीत दुखण्यास सुरुवात झाली. त्याने चालकाला याची सूचना केली. त्यानंतर चालकाने तातडीने त्याला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत त्याचा श्वास थांबला होता. गुरूवारी सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अश्विनच्या पाश्चात आई आणि वडील आहेत.