मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठीतील कविता म्हणत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. राऊत यांची अवस्था कोण होतास तू…काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाली असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच शिवसेनेकडून मुस्लिमांचे लांगूलचालन केले जात आहे, आता बाळासाहेब जनाब असा उल्लेख केला जातो, असे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 8 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले. त्यात त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चे निघाले. कुणाच्या ध्यानीमनी नसता इतके मोठे मोर्चे कसे काय निघतात? नियोजनाशिवाय हे मोर्चे निघणे शक्यच नाही. नियोजन झाले असेल तर सरकार, आयबी, गुप्तचर, पोलिसांनी कसे काय माहित नाही, असा सवाल त्यांनी केला. सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले. हा पद्धशीरपणे पोलरयाझेशनचा प्रयोग असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच या मोर्चामध्ये निवडून हिंदूंची दुकाने जाळली गेली. दुकान कुणाचेही जाळणे ते चुकीचेच. मात्र, या साऱ्या हिंसाचारावर महाविकास आघाडींच्या नेत्यांची तोंडे शिवली गेली. त्यात संजय राऊतांची अवस्था कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाल्याची जहरी टीका फडणवीस यांनी केली.
तसेच नवाब मलिक यांच्यावरही फडणवीस यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. नवाब मलिक यांचं नाव न घेता फडणवीस यांनी त्यांची तुलना फ्रान्सच्या एका कोंबड्याशी केली. फडणवीस म्हणाले, ‘हल्ली काही कोंबडे दिवसभर चॅनलवर बांग देत असतात. आधी हा कोंबडे फक्त सकाळी बांग देत होते, पण आता दुपारीही बांग देतात. दिवसभर चॅनलवर त्यांचं बडबडणं सुरु असतं.’ असं म्हणत हर्बल तंबाखू वक्तव्यावरूनही फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर नाव न घेता टीका केली.