मुंबई – एसटीच्या संपाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे समितीची नियुक्ती करण्यात आली असून कर्मचाऱ्यांची मागणी कमिटीपुढे जाऊन मांडावी लागेल. कमिटी जो अहवाल देईल तो सर्वांना लागू असेल. इन्क्रिमेंटची मागणी वगळता माझ्या अखत्यारितील सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. पंरतु संप जाणीवपूर्वक चिघळविण्याचा प्रयत्न केला जात असून कामगार राजकीय बळी ठरले तर ते दुर्दैवी असेल, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.
परब म्हणाले, बुधवारी सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा झाली. पण त्यांनी बाहेर जाऊन भलतेच सांगितले. दोन्ही विरोधी पक्षनेत्यांशी बोलायला मी केव्हाही तयार आहे. दुसरीकडे संप सुरुच राहिल्यास एसटीचेच मोठं नुकसान होईल. यात कामगार राजकीय बळी ठरले तर ते दुर्दैवी आहे. विलीनीकरणाची मागणी ताबडतोब 2-4 दिवसांत पूर्ण होणार नाही, वेळ लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नेत्यांनी कर्मचाऱ्यांना भडकवले तर नुकसान कर्मचाऱ्यांचेच आहे. विलीनीकरणासंदर्भात आधीच कमिटी नेमलेली असून जीआर काढलाय, ही वस्तुस्थिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच मी वारंवार आवाहन करत आहे की, नागरिकांची गैरसोय होत असल्याने संप मागे घ्यावा. तुमच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत. विलिनीकरणाचा निर्णय दोन-चार दिवसांत घेण्यासारखा नाही. त्यामुळे आपण चर्चा करुया आणि एकत्र त्यातून मार्ग काढूया. पण जर बेकायदेशीर संपाचे हत्यार उपसले जात असेल तर आम्ही कायदेशीर मार्गाचा वापर करु. ज्या पद्धतीची भाषणे सुरु आहेत, ती पाहता हा संप चिघळावा असे प्रयत्न सुरु आहेत. आज जे मागण्यांकरता जोरजोरात बोलतायेत त्यांच सरकार, मुख्यमंत्री होते. हाच न्याय एअर इंडियाला का नाही लावला, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगाविला.
आत्महत्या काही पर्याय नाही
आत्महत्या हा काही पर्याय नाही. जो आत्महत्या करतो त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. कर्मचा-यांनी साथ दिली तर एसटीला पूर्वीचे दिवस येतील. माझ्याशी कोणताही कामगार येऊन चर्चा करु शकतो, असे म्हणत त्यांनी आज पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.