मुंबई – शाहरुख पुत्र आर्यन खान याने स्वत:हून क्रुझ पार्टीसाठी तिकिटे काढलेली नव्हती, त्यांना तेथे फसवून नेण्यात आले आणि त्यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. या अपहरण व खंडणीच्या कटात समीर वानखेडे हेही सहभागी होते असा नवा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
या कटाचा मास्टरमाईंड हे भाजपचा नेता मोहीत भारतीय हा होता असा दावाहीं नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. आर्यन खान यांच्यावर करण्यात आलेली सारी कारवाई खोटी आणि बनावट होती असेही त्यांनी म्हटले आहे. या कारवाई पुर्वी समीर वानखडे यांनी मोहीत भारतीय यांची ओशिवराच्या कबरस्तानजवळ भेट घेतली होती व त्या भेटीत हा कट रचला गेला असेही मलिक यांनी म्हटले आहे. वानखडे नशिबवान ठरले कारण ओशिवरा जवळची सीसीटीव्ही कॅमेरे त्यावेळी नेमके बंद होते. मोहित भारतीय हा वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचा सदस्य आहे असा आरोपही त्यांनी केला.
वानखेडे याना ड्रग घेणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण करून ड्रग विकणाऱ्या लोकांना त्यांनी संरक्षण दिले असा नवाब मलिकांचा आरोप होता. आर्यनाला सोडवण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी केली गेली. 18 कोटी रुपयांमध्ये डिल फायनल झाले. त्यातील 50 लाख रुपये सुरुवातीचा हप्ता म्हणून वसूल केले गेले या आरोपाचाही मलिक यांनी यावेळी पुनरूच्चार केला. ज्यांनी समीर वानखेडे यांना अशा प्रकारे पैसे दिले आहेत त्यांनी स्वत:हून पुढे येऊन ही माहिती द्यावी, यात त्यांना आरोपी केले जाणार नाही कारण ते या प्रकरणातील व्हिक्टीम आहेत.
व्हिक्टीम कधी आरोपी नसतो असेही मलिक यांनी यावेळी नमूद केले. प्रतिक गाभा, आमिर फर्निचरवाला यांनी आर्यन खानला क्रुझवर नेले. ऋषभ सचदेवा, गाभा आणि फर्निचरवाला यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली; पण क्रुझवरील छाप्यानंतर या तिघांना मोकळे सोडले गेले असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
काशिफ खान या क्रुझ पार्टीचा आयोजक होता. त्यालाही सोडण्यात आले असून तो समीर वानखेडेचा बऱ्याच दिवसांपासूनचा मित्र आहे असा मलिक यांचा आरोप होता. समीर वानखेडे वर ज्या 26 प्रकरणांचे आरोप आहेत त्या सर्व प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली. यात सॅम डिसुझा नावाच्या माणसाचे जे नाव समोर आले आहे त्याचे खरे नाव सॅम विले असे आहे त्याला अजून का अटक करण्यात आली नाही असा सवालही त्यांनी केला.