दसरा संपला की, सर्वांनाच दिवाळीचे वेध लागतात. आता पाऊस संपलेला असतो. थंडीसुद्धा कडक नसते. ऊबदार… गुलाबी थंडी पडायला सुरुवात होते. वातावरणात एक प्रकारची उत्फुल्लता असते. आनंदाचा उत्सव साजरा करायला आपण अधीर होतो. या उत्सवाच्या तयारीतही भरपूर मजा अस ते.
शहरामधे असो की गावांमधे; सण साजरा करण्याचे प्रकार वेगळे असले तरी त्यांच्या मुळाशी आपल्या संस्कृतीचा एक समान धागा जोडलेलाच असतो. आज दिसत असलेलं शहर कधीतरी साधंसुधंच गाव असतं. कोणत्याही गावाशी दळणवळण वाढत गेलं की सोयीसुविधा वाढत जातात आणि मग ते गावही हळूहळू शहर होऊन जातं. मग जीवनशैली बदलते. पण अजूनही लहानपणी हातात फुलबाजी धरून, ती गोल फिरवत म्हटलेलं गाणं आपल्याला आठवत असतं ः
“दिन दिन दिवाळी, गायीम्हशी ओवाळी
गायीम्हशी कुणाच्या? लक्षुमणाच्या
लक्षुमण कुणाचा, आई-बापाचा
दे माई खोबऱ्याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी …’
हे गाणं मुळात गावखेड्यातलं आहे. कारण पूर्वी गावाकडे घराघरातले कान्हा म्हणजे गुराखी आपापली गायीगुरं घेऊन रानात जायचे. तिथं त्या गुरांना वाघाचं भय असायचं. त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून हे गुराखी हातात काठी बाळगायचे. घरातलं पशुधन म्हणजे शेतकऱ्याची दौलतच. म्हणून मग ते जपायचं, त्याची पूजा करायची. मुळात हा दिवाळीसण कृषीसंस्कृतीतील आहे. म्हणूनच आजही मराठवाड्यात हा सण गायी-गुरांचा उत्सव म्हणून साजरा करतात.
या दिवसात तिथले गुराखी गुरांना ओवाळण्यासाठी लव्हाळं नावाच्या उंच गवताच्या पणत्या करतात आणि त्या गवताचीच उभी कांडी करून त्यात पाच पणत्यांचे थर गुंफतात. आदिवासी समाज दिवाळीच्या दिवसात आपल्या गुरं-बकऱ्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांची पूजा करतात तर धनगर समाज दिवाळीत मेंढ्यांचं खूप कौतुक करतात. आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांची बळीराजा म्हणून पूजा केली जाते.
“इडापीडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असं म्हटलं जातं. बळीराजा हा शेतकऱ्यांचा देव मानला जातो. बळीचं राज्य म्हणजे अर्थातच शेतकरी राजाचं राज्य. कारण खरं तर दिवाळी हा परंपरेनं चालत आलेला अनागर संस्कृतीतील कृषिउत्सव आहे. दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव तो नंतर झाला. शहरात आल्यावर.
शहरांमधे हल्ली वर्षभर सगळी दुकानं, मॉल कसे भरून वाहत असतात! एके काळी खरेदीसाठी दिवाळीची वाट पहावी लागे. फटाके, फुलबाज्या, फराळ, सडारांगोळी यांनी वातावरण बदलून जाई. दिवाळीची तयारी म्हणजे घराची स्वच्छता, आकाशकंदील करण्यासाठी त्याचं सामान आणणं, फराळ तयार करण्याची घाई… असं सारं असे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ करीत असताना बाकीच्या भावंडांनी बाहेर फटाके वाजवायचे;
एकमेकांकडे दिवाळीच्या सणाला जायचं, रहायचं. एरवी वेगळे राहत असलो, तरी या दिवशी सगळ्यांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी करायची. त्या निमित्तानं सगळ्यांच्या भेटी होत. आता ही सगळी मजा काळाच्या पडद्याआड गेली आहे. पण भारतीय माणसाला सणउत्सव साजरा करण्याची भलती हौस. तो साजरा करण्याची, त्यातून आनंद घेण्याची माणसाची वृत्ती बदलली नाही. फक्त त्याचे प्रकार आता बदलले आहेत. पद्धत बदलते आहे.
दिव्यांच्या माळा, तयार आकाशकंदील, रंगीत पणत्या घराची शोभा वाढवू लागले. आता आपण सगळेच उत्सव घरोघरी करण्यापेक्षा बाहेर आणि मोबाइलवर साजरे करायला शिकलो आहोत. नरकचतुर्दशीच्या दिवशी लवकर आंघोळ झाल्यावर, अनायासे लवकर आंघोळ झालीय तर आज तरी काकड आरतीला हजेरी लावू म्हणणारी मुलं आता राहिली नाहीत. त्याऐवजी ती मोबाइलवरून “शुभ-दीपावली’चे संदेश पाठवण्यात मग्न होतात.
आता दिवाळी पहाट वगैरेंसारख्या गायनाचे, नाटकाचे कार्यक्रम आपली दिवाळी संगीतमय करतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांत गर्दी टाळून घरबसल्या ऑनलाइन खरेदी होऊ लागली. वाहन खरेदी, घर खरेदी जोरात होते. आता लाडू-चकलीसाठी दिवाळीची वाट कोणी पाहत नाही. ते वेळोवेळी दुकानातून आणले जातातच आणि शिवाय तोंडाला चव आणणारे पदार्थांचे असंख्य प्रकार आता बारा महिने मिळू लागलेत.
ज्यांना फटाक्यांचे आवाज, गाड्यांचा गजबजाट आवडत नाही, ते दिवाळीच्या मुहूर्तावर सरळ एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन स्वस्थपणे राहतात. कुणी वाचनवेडे केवळ दिवाळी अंकांसाठी दिवाळीची वाट पाहत असतात. कुणी डोंगरवाटा तुडवत भटकंती करतात तर कुणी चांगले सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना भेटी देऊन देणगीही देतात. गेल्या दीडदोन वर्षात आपल्या या भरगच्च सामाजिक जीवनाला दृष्ट लागल्यासारखे झाले होते.
यंदा साजऱ्या होणाऱ्या दिवाळीवर आर्थिक अरिष्टाची छाया आहे. पुराने झालेल्या हानीमुळे दिवाळीच्या आनंदाला दुःखाची किनार आहे. करोनाच्या साथीमधे दगावलेली माणसं, सीमेवर हौतात्म्य पत्करलेले जवान, इतरांचे आजार बरे करताना स्वतःचा जीव गमावणारे डॉक्टर्स व परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, जोखीम पत्करणारे पोलीस, या सर्वांचा त्याग स्मरताना यंदाची दिवाळी खिन्न वाटते आहे.
तरीही माणसे आनंदाची नवनवी कारणे शोधतच असतात. जगण्यातला उत्साह, त्यातून मिळणारी ऊर्जा यानेच आयुष्य सुसह्य होते. म्हणूनच संकटे आली, अरिष्टे आली तरी आपल्या मनातला उत्कटतेचा, आनंदाचा झरा आटू देता कामा नये. काहीही झाले तरी आपल्या सांस्कृतिक भवतालात दिवाळीचे महत्त्व उरतेच. मनाची उभारी वाढवण्यासाठी, जगण्याच्या दुर्दम्य इच्छांच्या पूर्तीसाठी आणि जगण्याच्या समृद्धीसाठी ही दिवाळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात यायलाच हवी असते.
आणि म्हणूनच निराशा, तक्रारी सारे काही मागे टाकून म्हणावेसे वाटते,
नवीन आले साल आजला
उजेड पडला नवा
दिवा लावू या दिवा
– माधुरी तळवलकर