सोलापूर: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील प्रमुख घटक असणाऱ्या संत ज्ञानेश्वर आणि जगतगुरु संत तुकोबाराय यांच्या आषाढी एकादशीच्या पालख्या एकत्र येण्याचं ठिकाण असलेल्या वाखरीमध्ये बिअर बार उघडण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र ठराव करण्यात आला आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीच्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे शेवटच्या मुक्कामाचे ठिकाण आणि पालखी सोहळ्यातिल शेवटचे गोल रिंगण वाखरीमध्ये होते.
लाखो वारकऱ्यांची विसाव्याचे शेवटचे ठिकाण असलेल्या पालखी मार्गावरील वाखरी गावात बियर शॉपीचा बार उडणार आहे. वाखरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने गुरुवारी तब्बल 23 नव्या बिअर शॉपीना नाहरकत देण्याचा ठराव मंजूर केला.
पालखी मार्गावरील प्रमुख गाव असणाऱ्या वाखरीची लोकसंख्या आठ हजारांच्या आसपास आहे. नव्यानं सुरु होणाऱ्या बिअर शॉपीमुळे या गावात 347 नागरिकाप्रमाणे एक बियर शॉपी सुरू होणार आहे. आधीच्या तीन शॉपिंग गृहीत धरल्यास तीनशे सात नागरिकांच्या मागे एक बिअर शॉपी असं प्रमाण होणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या सर्व 17 सदस्यांनी बिअर शॉपी साठी ना हरकत मागणीचे अर्ज फेटाळले होते. अर्जदारांनी लॉबिंग करत ग्रामसभेत प्रत्येकी एक लाखाचा ग्रामनिधी घेऊन नाहरकत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. बिअर शॉपीला मंजुरी देण्यात आल्यानं महिला ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात आला आहे.