पिंपरी -गेली लग्नसराई करोनामुळे फिकी गेली. मंगल कार्यालये, केटरिंग, सजावट इतर अनेक व्यवसायांना खूप मोठा फटका बसला होता. यंदा सात महिन्यांमध्ये 58 विवाह मुहूर्त आहेत आणि करोनाची लाटही ओसरत आहे. परंतु तरीही महापालिकेकडून विवाह सोहळ्यांबाबत कोणत्याही सूचना प्राप्त न झाल्याने मंगल कार्यालयांचे बुकींग रखडले आहे.
महापालिकेने विवाह सोहळ्याला परवानगी दिल्यास मंगल कार्यालयांसह बॅंडबाजा, हॉल, डीजे आणि केटरिंग व्यावसायिकांचे अर्थकारण बदलणार आहेत.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू आहेत. मात्र विवाह सोहळ्यांबाबत कोणतीच सूचना महापालिकेने दिलेली नाही.
नोव्हेंबर ते जुलै या सात महिन्याच्या कालावधीत लग्नाकरिता तब्बल 58 मुहूर्त आहेत. ज्यांची सोयरीक जुळली आहे, त्यांची मंगल कार्यालयाच्या बुकींगसाठी लगबग सुरु आहे. मात्र मंगल कार्यालयांना महापालिका अथवा पोलिसांकडून कोणतीच सूचना देण्यात आलेली नाही. निर्बंध शिथिल केले आहेत की नाहीत? उपस्थितांच्या संख्येत वाढ केली आहे की नाही? याबाबत कोणत्याच सूचना नसल्याने बुकींग होत नसल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दीड वर्षात करोना कालावधीमध्ये विवाह सोहळे झाले; मात्र वऱ्हाडी मंडळींची संख्या मर्यादित होती. यामुळे गेल्या दीड वर्षांत पिंपरी चिंचवड शहरात विवाह सोहळे मोठ्या थाटात साजरे झाले नाही. अनेकांनी विवाहही पुढेही ढकलेले.
या सगळ्याचा परिणाम विवाह सोहळे आयोजन करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांवर झाला आहे. कर्ज काढून सजावट केलेले सभागृह आणि त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय अडचणीत आले होते. यामुळे यंदा तरी या व्यवसायाला पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याची आशा आहे.
दोन वर्ष एकही बुकींग झालेले नाही. किंबहुना अनेकांनी बुकींग रद्द केले. मात्र दोन वर्षांत झालेले नुकसान भरून काढणे शक्य नाही. मंगल कार्यालयाच्या मालकांना आर्थिकदृष्ट्या अनेक अडचणी आल्या. आता बुकींगसाठी नागरिक चौकशी करीत आहेत. मात्र पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून काहीही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे बुकींग घ्यावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. – नीलेश आहेर, मालक, मंगल कार्यालय.